*कोंकण एक्सप्रेस*
*शाहू महाराजांची जयंती घरोघरी साजरी व्हावी*
*विजय सावंत यांचे प्रतिपादन : गोपुरी आश्रमात शाहू महाराज यांची जयंती साजरी*
*कणकवली ः संजना हळदिवे*
छत्रपती शाहू महाराज यांची जयंती घरोघरी साजरी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष विजय सावंत यांनी केले.
गोपुरी आश्रम येथे छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री. सावंत बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी सदाशिव कदम होते, विनायक सापळे, अर्पिता मुंबरकर, अजिम प्रेमजी फाउंडेशनचे शिमोन पाटोळे, संदीप सावंत, नितीन तळेकर, महानंदा चव्हाण, सखाराम सपकाळ, तातू राणे, दुर्वांक मेस्त्री, गुरुप्रसाद तेंडोलकर, कार्तिक गोसावी, सहदेव पाटकर, वृषाली शहारे, शुभम पवार, नितीन जावळे आदी उपस्थित होते.
विजय सावंत म्हणाले, छ. शाहू महाराजांनी महाराष्ट्रात पुरोगामी विचार रुजवले. मात्र, आजचा महाराष्ट्र मागास किंबहुना अधिकाधिक मागास होत चालला आहे. पुरोगामी विचार संपवले जात असून प्रतिगामी विचारांना प्रोत्साहन दिले जात आहे. विनाशकारी प्रकल्पांच्या माध्यमातून जल, जंगल, जमीन झपाट्याने नष्ट होत चालली आहे, त्याचे सरंक्षण आपण केले पाहिजे. शाश्वत विकासाचे शिवधनुष्य गोपुरी आश्रमाने उचलण्याचा निर्धार केला आहे, त्याला आपल्या सर्वांची साथ मिळणं गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सदाशिव कदम म्हणाले, छ. शाहू महाराजांनी आरक्षणाचे महत्त्व सर्वात आधी जाणले होते. छ. शाहू महाराजांना ४८ वर्षांचे अल्प आयुष्य मिळाले. मात्र या काळात त्यांनी फार मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. विनायक सापळे, अर्पिता मुंबरकर, शिमोन पाटोळे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन कुमारी सावंत हिने केले. आभार संदीप सावंत यांनी मानले.
फोटो
…………..
कणकवली-आचरा मार्गावरील पाण्याचा निचºयाची उपाययोजना करा
कलमठ ग्रामपंचायतीकडे धीरज मेस्त्री यांची मागणी
कणकवली : कलमठ बाजारपेठेतील कणकवली-आचरा मार्गावर पावसाचे पाणी साचून राहत आहे. परिणामी रस्त्यावर खड्डे पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांनी कलमठ ग्रा. पं. प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरू झाला आहे. कलमठ बाजारपेठ हद्दीत कणकवली-आचरा मार्गावर पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्याच पाण्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागत आहे. पाण्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी ग्रा. पं. प्रशासनाने रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मेस्त्री यांनी केली आहे.

