*कोंकण एक्सप्रेस*
*उद्यापासून तिराळी घाटातून एस टी बसेस धावणार..*
*दोडामार्ग/शुभम गवस*
दोडामार्ग पासून बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा सर्वात लगतचा मार्ग म्हणजे तिराळी घाटातून जाणारा मार्ग, या मार्गे गेल्या पावसाळ्यात बंद झालेल्या एस टी बसेस आज मिती पर्यंत बंद होत्या. या बसेस पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी स्थानिक ग्रामस्थाना बरोबर घेवून आंदोलने केली, याची दखल घेतं सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी घाटात दुरुस्तीचे काम केले, त्यांनतर अवघड घाट वळणावर आरसे बसवण्याच्या सूचना वाहतूक विभाग नियंत्रकाकडून करण्यात आल्या, त्याही अंमलात आल्यानंतर आता उद्या २ एप्रिल पासून एस टी बसेस सुरु होण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. तसे पत्र वाहतूक नियंत्रक विभाग कोल्हापूर यांच्याकडून आगार व्यवस्थापक कोल्हापूर यांना मिळाले आहे त्यामुळे कोल्हापूर आगाराच्या लाल परी उद्या पासून या मार्गावर धावतील यातील पहिली एस टी बस दुपारी १२:३० वाजतां कोल्हापूर हुन दोडामार्ग जाणारी पहिली एस टी बस रवाना होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.कोदाळी येथे होणार भव्य स्वागत …श्रीफळ वाढवून होणार शुभारंभ – प्रविण गवस
सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी या एस टी बसफेऱ्या सुरु व्हाव्यात यासाठी आक्रमक भुमिका घेतली होती, त्यांनीही या निर्णयाने समाधान व्यक्त केले असून या कामी विशेष सहकार्य करणारे चंदगड भागाचे आमदार शिवाजी पाटील यांचे आभार मानले आहे. आपण या एस. टी. बसचे कोदाळीत भव्य स्वागत करू व श्रीफळ वाढवून बस फेरीचा शुभारंभ करू असे म्हटले आहे.