*कोंकण एक्सप्रेस*
*सामाजिक संस्थांसाठी एकदिवसीय कार्यशाळा कणकवली येथे यशस्वीरीत्या संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग येथे नुकतीच संकल्प प्रतिष्ठान व रेनोवेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक संस्थांसाठी एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. कार्यशाळेचा उद्देश संस्था अनुपालन, प्रशासन, निधी संकलन आणि सीएसआर निधी प्रकल्प प्रस्ताव लेखन याविषयी सखोल माहिती देणे हा होता. मुंबई, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे ३८ प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
कार्यशाळेची सुरुवात नोंदणी सत्राने झाली, त्यानंतर ॲड. टीना पटेल यांनी संस्था अनुपालन, नोंदणी प्रक्रिया आणि कायदेशीर बाबी याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेच्या शाश्वत विकासासाठी योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.
दुपारनंतर श्री. सनी पवार यांनी निधी संकलनाच्या तंत्रांवर मार्गदर्शन केले तसेच वित्तसहाय्य मिळवण्यासाठी प्रभावी धोरणांवर सखोल चर्चा केली. त्यांनी सीएसआर प्रकल्प प्रस्ताव लेखनाविषयी सत्र घेतले आणि प्रभावी प्रस्ताव तयार करण्याच्या मुख्य बाबी स्पष्ट केल्या. सीएसआर ला प्रकल्प सादर करताना प्रकल्पात कोणकोणत्या बाबींचा समावेश असायला याबाबतही मार्गदर्शन केले. तसेच सहभागी प्रतिनिधींनीना प्रकल्प लेखनासाठी उपयुक्त असे फॉरमॅट देण्यात आले.
रेनोवेट इंडियाचे सहसंस्थापक, प्रथमेश रावराणे यांच्या विशेष सत्रामध्ये जीबी अकॅडमी अंतर्गत सामाजिक संस्थांसाठी असलेल्या त्यांच्या विशेष ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली, ज्यामुळे संस्थांना क्षमता वाढविण्यास आणि प्रभावी कार्य करण्यास मदत होईल.
कायशाळेची सुरवात संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मुरादअली शेख यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली, ज्यामध्ये त्यांनी सहभागी संस्थांना मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून संस्थेच्या कार्याची प्रभावीता वाढवण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेचा समारोप व प्रमाणपत्र वितरण करताना गोपूरी आश्रम संस्थेचे अध्यक्ष मान. प्रा राजेंद्र मुंबरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकल्प प्रतिष्ठानचे सचिव श्री अमोल भोगले यांनी केले.
सहभागी प्रतिनिधींनी कार्यशाळेच्या संवादात्मक स्वरूपाचे आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. ही कार्यशाळा सामाजिक संस्थांच्या नेटवर्किंगसाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ ठरली.