*कोंकण एक्सप्रेस*
*बुडून मृत्यू झालेल्या मच्छीमाराच्या कुटुंबाला गाबीत समाजाचा मदतीचा हात*
*तारामुंबरी येथील संतोष सारंग मच्छीमाराच्या कुटुंबाला १ लाख ३५ हजाराची मदत*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
तारामुंबरी मिठमुंबरी खाडी पात्रात २ मार्च २०२५ रोजी दुपारनंतर मुळे (शिंपले) काढण्यास गेलेल्या तारामुंबरी- मुरमणेवाडा येथील मच्छीमार संतोष तुकाराम सारंग यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यू नंतर गाबीत समाजातील मुंबई स्थित व देवगड येथील गाबीत बांधवांनी एकत्रित येऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे सोशल नेटवर्किंग साईटवर आवाहन केले. त्या आवाहनाला गाबीत समाज बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला व त्या माध्यमातून सुमारे १ लाख ३५ हजार रुपये जमा झाले. ही रक्कम दिवंगत संतोष सारंग यांची पत्नी श्रीमती शितल सारंग यांच्या बचत खाते मध्ये बॅक ऑफ इंडिया खात्यात वर्ग करण्यात आली. संतोष सारंग यांचा पुत्र कु.मंगेश सारंग याच्या पुढील पदवी शिक्षणाचा संपुर्ण खर्च हा विजयदुर्ग येथील विष्णू सारंग प्रतिष्ठानने उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
ही मदत रक्कम उभारण्यासाठी सर्वतोपरी समाज बांधव रामचंद्र यशवंत सारंग ऊर्फ बबन सारंग तसेच विष्णू प्रतिष्ठानचे रामचंद्र दत्ताराम सारंग, राजकुमार राजाराम सारंग, अनंत गोकुळ सारंग, सुदर्शन लक्ष्मण सारंग यांनी विशेष मेहनत घेतली. ही जमा झालेली रक्कम रुपये एक लाख पस्तीस हजार ही सारंग कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी रामचंद्र उर्फ बबन यशवंत सारंग, रामचंद्र दत्तात्रय सारंग, अनंत गोकुळ सारंग, सुजय गोपाळ धुरत, हृदयनाथ रामचंद्र तारी, लक्ष्मण विठ्ठल तारी, सुहास पराडकर, महादेव मुणगेकर, रमेश मनोहर तारी, सौ. उषःकला केळुसकर आदी गाबीत समाज भगिनी आणि बांधव याप्रसंगी उपस्थित होते.