*कोंकण एक्सप्रेस*
*साहित्य संमेलन आणि मराठी भाषा*
*कणकवली*
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर भूषविणार आहेत. देशाच्या राजधानीत ७१ वर्षांनंतर हे साहित्य संमेलन होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर हा विशेष लेख ……
दिल्ली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थाने मराठी भाषेसाठी व साहित्यासाठी मैलाचा दगड ठरेल असे म्हणायला हरकत नाही. प्रतिवर्षी मराठी भाषेची साहित्य संमेलने निरनिराळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येतात. अनेक वेळा तर भारताबाहेरही आयोजित करण्यात आलेली आहेत. परंतु यावर्षीच्या या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला एक विशिष्ट आयाम आहे. हे मी अशासाठी म्हणतो की नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्या अनुषंगाने मराठी भाषेचा सर्वांगीण विकास होऊ घातला आहे आणि कोणत्याही भाषेचा विकास म्हटला की त्या भाषेमध्ये निर्माण होणारे साहित्य, साहित्यिकांचे योगदान व साहित्य संमेलने ही नितांत गरजेची बाब असते. म्हणूनच हे साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असताना त्याला एक अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे…..
मराठी भाषेच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास आदरणीय पंतप्रधान मोदीजी हे या संमेलनाचे उद्घाटक आहेत. त्यांचे मराठी भाषेवरचे प्रेम सर्वश्रुत आहे. अनेक वेळेला त्यांच्या भाषणातून मराठी साहित्याविषयी व साहित्यिकांविषयी त्याची प्रचिती दिसून आलेली आहे. अनेक मराठी साहित्यिकांची नावे त्यांना मुखोद्गत आहेत.असा एक माणूस तोही देशाचा पंतप्रधान या साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून लाभावा ही तमाम मराठी साहित्यिकांच्या दृष्टीने व मराठी भाषेच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे.
भाषेचा विकास जसा दर्जेदार लिखाणातून होतो, चांगल्या वाचकातून होतो, तसाच तो आर्थिक पाठबळावरही अवलंबून असतो.अनेक वेळा खूप चांगले साहित्यिक प्रकल्प केवळ आर्थिक त्रुटींमुळे कार्यवाहीत आणता येत नाहीत. पर्यायाने त्या कार्यक्रमाचे व भाषेचे नुकसान होते. त्यामुळेच आदरणीय मोदीजींसारखी मराठी भाषेवर व साहित्यिकांवर प्रेम करणारी राजकीय मंडळी यांचा पाठिंबा मराठी भाषेला मिळाला तर ती अत्यंत आनंददायी बाब ठरेल यात दुमत असण्याचे कारण नाही.
आज ग्रामीण भागातील अनेक साहित्यिक दर्जेदार साहित्याची निर्मिती करीत आहेत. परंतु आर्थिक दृष्टिकोनातून त्याचे प्रकाशन करणे परवडत नसल्याने असे साहित्य वाचकासमोर येत नाही, परिणामी भाषेचा विकास खुंटतो.त्यामुळे दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनातून व अशाच प्रकारच्या अन्य साहित्य संमेलनातून असे साहित्य प्रसिद्ध कसे करता येईल यावर विचार मंथन व्हायला हवे. अर्थात मराठी साहित्य परिषदेसारख्या अनेक संस्था आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यांना जर आर्थिक पाठबळ मिळाले तर नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करून ते वाचकांसमोर आणण्याचे कार्य त्यांना सुलभ रीतीने करता येईल. ही आजची गरज आहे. त्यामुळे जेष्ठ साहित्यिकांनी व मराठी साहित्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ही बाब राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या निदर्शनास आणावी असे मला आग्रहाने नमूद करावेसे वाटते.तसे झाल्यास मराठी साहित्य विश्वात मोलाची भर पडेल व त्यातून प्रेरणा घेऊन अनेक नवीन साहित्यिक निर्माण होतील.
केवळ साहित्यिक निर्माण झाले, त्यांनी नवनवीन साहित्याची निर्मिती केली,नवीन पुस्तके प्रकाशित झाली म्हणून त्या भाषेची प्रगती होते असे मानता येणार नाही हे निश्चितपणे खरे आहे. नवीन साहित्याची निर्मिती सातत्याने व्हायला हवी,तथापि अशी जी निर्मिती होते तिला दर्जेदार वाचकही मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. खूप साहित्य निर्मिती झाली आणि ती पुस्तके, ते साहित्य प्रकाशाकडे व वाचनालयातून पडून राहिले तर खऱ्या अर्थाने भाषेची प्रगती होणार नाही. म्हणून भाषेची प्रगती होण्यासाठी निर्माण होणारे साहित्य वाचले गेले पाहिजे, त्यावर विचार केला पाहिजे तरच त्यातून ज्ञानसाधना होईल आणि ती तशी व्हावी म्हणून जनमानसात वाचनाचे महत्त्व, वाचन संस्कृती रुजावी म्हणून सातत्याने प्रयत्न व्हायला हवेत. अर्थात हे प्रयत्न होण्यासाठी खऱ्या अर्थाने वाचनालये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. वाचनालयानी निरनिराळे कार्यक्रम आयोजित करून वाचक आकृष्ट होतील असे उपक्रम राबवायला हवेत, जेणेकरून वाचकांची संख्या वाढीला लागेल व ज्ञानसाधना जोपासण्यास मदत होईल. निर्माण झालेले नवनवीन साहित्य जनमानसात पोहोचेल,रुजेल व त्यातून नवीन साहित्यिक निर्माण होतील. असा हा भाषेच्या उन्नतीचा प्रवाह खळखळून वाहता ठेवणे हे प्रकाशकाबरोबरच वाचनालयांचेही काम आहे.वाचनालयामध्ये कार्यरत असणाऱ्या मंडळींनी याबाबत उत्साही असणे गरजेचे असून शासनस्तरावरून त्यांना आर्थिक पाठिंबा कसा मिळेल हेही पाहिले जाणे महत्त्वाचे आहे. मला इथे ही गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की वाचन संस्कृती रुजविणे हा भाषेच्या सर्वांगीण विकासाचा कळीचा मुद्दा आहे हे सर्वमान्य आहे.त्यामुळे केवळ कागदोपत्री पूर्तता न करता वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.त्यासाठी सर्व जागरूक साहित्य प्रेमींचे योगदान मोलाचे ठरेल असे मला वाटते.
शाळा कॉलेजातील मुलांना शिक्षक त्यांना नेमून दिलेल्या अभ्यासक्रम शिकविण्याकडे लक्ष देतात, ते योग्यच आहे. तथापि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना अभ्यासक्रमाबाहेरील अन्य पुस्तके वाचण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन केले, प्रेरीत केले तर भाषा संस्कृती जोपासण्याचे खूप मोठे कार्य होऊ शकेल. प्राथमिक शाळा,विद्यालये व महाविद्यालये यातून हे घडून येऊ शकते. त्यासाठी प्रत्येक विद्यालयामध्ये त्याच्या दर्जा नुसार एक वाचनालय असणे व त्याचा वापर विद्यार्थ्यांनी करावा म्हणून शिक्षकांनी त्यांना प्रेरित करणे खूप गरजेचे आहे. असे झाले तर खऱ्या अर्थाने संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल त्यामुळे अनिष्ट प्रवृत्तींना आळाही बसू शकेल हा दुहेरी फायदा येथे अभिप्रेत आहे.हि बाब शासनाच्या सहकार्याने होऊ शकते. यासाठी होणारा खर्च हा शैक्षणिक खर्च मानण्यास काहीच हरकत नाही. ही योजना खऱ्या अर्थाने अंमलात आली तर शैक्षणिक दृष्ट्या व भाषेच्या उन्नतीच्या दृष्टीने खूप दूरगामी परिणाम साधणारी होईल असे मानण्याला वाव आहे. साहित्य संमेलनानी यावर विचार मंथन करून,असे ठराव घेऊन ते शासनाकडे पाठवावेत असे मला यानिमित्ताने म्हणावेसे वाटते.
दिल्ली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या उन्नतीला पूरक ठरेल अशी एकूणच स्थिती आहे. आयोजकांनी सहभागी मान्यवरांचा हात घट्ट धरून वाटचाल केली तर ते साध्य होईल. साहित्य आणि राजकारण असा भेदभाव न होता त्यांची एक दिलाने होणारी वाटचाल भविष्यात मराठी भाषेला शिखर गाठायला मदत करेल यात शंका नाही. देवी सरस्वतीचा वरदहस्त या सारस्वतांना लाभो व मराठी सारस्वतांचा दरबार उन्नतीची वाटचाल करो अशी प्रार्थना करून पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुभेच्छा देतो.
*राजस रेगे, कणकवली, सिंधुदुर्ग*
9422379123