*कोंकण एक्सप्रेस*
*गोपुरी आश्रम चा कृषी सन्मान पुरस्कार राखी तावडे यांना जाहीर*
*कणकवली : प्रतिनिधी*
गोपुरी आश्रम वागदे तर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार 2025’ कृतीशील महिला शेतकरी राखी राजेश तावडे राहणार नाधवडे सरदारवाडी यांना जाहीर झाला असून रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वितरित केला जाणार आहे.
जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार्थी शेतकऱ्याची निवड करताना वैयक्तिक प्रयोगशीलता व आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केलेले प्रयत्न हे मुख्य निकष लावले जातात.राखी तावडे व राजेश तावडे हे पती-पत्नी नाधवडे गावी नारळ, काजू, आंबा, आवळा अशी बागायती पिके तर घेतात. शिवाय भात व भुईमूग सारख्या पिकांच्या दर्जेदार बियाण्याचे उत्पादन करून त्या परीसरातील शेतकरी बांधवांना पुरवून चांगले उत्पन्न घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यानी नारळाच्या बागेत मसाल्याच्या पिकांची आंतरपीक लागवड यशस्वी केली आहे. याबाबत इतरांनाही मार्गदर्शन करतात.
मनुष्यबळाच्या कमतरतेतून शेती बंद करणे ऐवजी शेतीमध्ये आधुनिकता आणताना त्यांनी विविध यांत्रिक अवजारे देखील आणली आहेत त्याचा वापर करून कमीत कमीत मनुष्यबळात अपेक्षित उत्पादन घेण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यावर्षीचा पुरस्कार राखी तावडे या शेतकरी महिलेला जाहीर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे असे मत गोपुरी आश्रम चे अध्यक्ष डॉ राजेंद्र मुंबरकर यांनी यावेळी व्यक्त केले.