*कोकण Express*
*नेमळे देऊळवाडी येेथ आंब्याच्या बागेला आग लागून लाखोंची हानी*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
नेमळे देऊळवाडी येथील आंबा कलम बागेत लागलेल्या आगीत लाखोंची हानी झाली आहे. मनोहर शांताराम परब यांची ही बाग होती. आंबा हंगामाच्या काळात लागलेल्या या आगीत परब यांची आंब्यांनी बहरलेली पंधरा आंबा कलमे भस्मसात झाल्याने त्यांच्यावर फार मोठे संकट कोसळले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आंबे कलमांसोबतच या आगीत वीस काजू कलमे, बांबुच्या चार बेटीही होरपळून गेल्या. त्याचबरोबार वीस हजार किंमतीची गवताची गंजी, पंधरा हजार किंमतीचे भात मळणी यंत्र जळून खाक झाले. त्यामुळे परब यांचे लाखोंचे नुकसान झाले असून त्यांच्या जणू आभाळच कोसळले आहे. दरम्यान, ही आग लागल्याची माहिती मिळताच नेमळे तलाठी अरुण पाटोळे,लिपीक सुनील राऊळ, बाबु परब यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच कृषी विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला कळवून पंचयादी तयार करणार असल्याचे सांगणयात आले यावेळी बाबु परब यांनी स्पष्ट केले. मात्र उशिरापर्यंत कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. परब यांच्या या बागायतीलगत रेल्वेचा ट्रॅक असल्यामुळे रेल्वेतील प्रवाशांकडून टाकलेल्या विडी किंवा सिगारेटमूळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, या आगीत झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवुन द्यावी असे आवाहन नुकसानग्रस्त शेतकरी मनोहर परब यांनी केले आहे.