*कोंकण एक्सप्रेस*
*आनंदवाडी येथील घरांचे महसूल विभागाकडून सर्व्हेक्षण*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला-आनंदवाडी येथील गेली २०० वर्ष प्रलंबित राहिलेल्या लोकांच्या राहत्या घराचा प्रश्न हा महासंघाचे पदाधिकारी व आनंदवाडी ग्रामस्थ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील व महसूल विभागाला हा विषय अतिशय गंभीर असून त्यांचे निवारण तत्परतेने करायला हवे असे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आनंदवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. त्यामुळे आनंदवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वंचित समाजाच्या प्रलंबित समस्या व विकास कामे यांची सोडवणूक व्हायला हवी यासाठी संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्ग यांच्या प्रयत्नातून व पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशाने समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा घेण्यात आला होता. यावेळी उपस्थित माजी समाज कल्याण सभापती तथा महासंघाचे जिल्हा संघटक अंकुश जाधव, महासचिव गौतम खुडकर यांनी चर्चा करताना सांगितले की, या लाभापासून कोणीच वंचित राहू नये, कोणावरही अन्याय करू नका, पालकमंत्री राणे यांच्या सूचनेप्रमाणे सर्वेक्षण करा आणि अहवाल सादर करा. पालकमंत्री यांनी कार्यतत्परता दाखवल्यामुळे वंचित समाजाला विकासाच्या बाबतीत न्याय मिळत आहे. उपस्थित ग्रामस्थ यांनी पालकमंत्री यांच्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले.
आनंदवाडी येथील सर्वेक्षणावेळी महसूल विभागाचे तलाठी आर. जी.तांबोसकर, कोतवाल सुरेश मटकर यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून माहिती घेतली. यावेळी महासंघाचे जिल्हा संघटक अंकुश जाधव, ग्रामस्थ माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे तसेच सखाराम जाधव, जयंत जाधव, सुरेश जाधव, विकास जाधव, विठ्ठल जाधव, अजय जाधव, सत्यवान जाधव, शशांक जाधव, तेजस जाधव, राजन जाधव, महेंद्र जाधव, मोनाली जाधव आदी उपस्थित होते.