*कोकण Express*
*महाविद्यालयीन जीवनातच व्यक्तिमत्व विकास होतो! ; रंजन चिके*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये एफ.वाय.बी.ए. व एफ.वाय.बी.कॉम. च्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता.
त्याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की, विद्यार्थ्यांचा कार्यक्रमातील सहभाग महाविद्यालयाची शान वाढवत असतो. महाविद्यालयीन शिक्षणातून जगण्याला विशिष्ट आकार मिळतो. एकदा का हा आकार चांगला मिळाला की जीवन समृद्ध होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते मा श्री रंजन चिके म्हणाले की, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीने खूप प्रयत्न केले. माझा विश्वास आहे की शिक्षणातील कष्ट कधीच वाया जात नाहीत. आपल्या जीवनाला शिक्षणाचा संस्कार आवश्यक असतो. जिद्द बाळगली तर जगातल्या कोणत्याही यशाला गवसणी घालता येते. तुमच्या विकासासाठी काहीही करायची आमची तयारी असेल, पण तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. उपलब्ध सोईसुविधाचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा ध्यास धरा. आणि उच्चपदाच्या नोकरीचा आनंद घ्या. आपले कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा, कष्ट करा. आमचा विद्यार्थी कर्तबगार होणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते मा श्री. संदेश पटेल म्हणाले की, वास्तवातला आत्मविश्वास हाच मोठेपण देतो. सर्वांनीच आनंदी जीवन जगले पाहिजे, महाविद्यालयीन जीवनातील कॉलेज कट्टा ही संकल्पना पुन्हा साकार केली पाहिजे. खरे जीवन शिक्षण हे कॉलेज कट्ट्यावर जेवढे मिळते तेवढे कुठेच मिळत नाही. तोच कट्टा खरे जीवन शिकवतो व घडवतो. विद्यार्थ्यांना कलाकार म्हणून महाविद्यालयातूनच घडता येते. तोच कलाकार भविष्यात देश घडवत असतो. कलेमुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता येते. प्रत्येकाने अंतर्मनाचा आवाजही ऐकायला शिकले पाहिजे. त्यामुळे आपण चिंतनशील बनतो आणि आयुष्याबद्दल सकारात्मक होतो.
याप्रसंगी विद्यार्थिनी खुशी कामतेकर, रेवती मेस्त्री, रिया मेस्त्री, लक्ष्मी पाटकर यांनी आपली मनोगते माडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विभागप्रमुख प्रा विनोदसिंह पाटील यांनी केले,पाहुण्याची ओळख व स्वागत डॉ. रायबोले यांनी तर आभार प्रा. कीर्ती पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

