*कोकण Express*
*देवबागातील एकाचा तरी जीव गेल्यास ३०२ चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू ; निलेश राणें*
*संरक्षक बंधाऱ्याचे कामात जाणूनबुजून अडचणी निर्माण केल्याचा आरोप…*
*मालवण ः प्रतिनिधी*
देवबाग येथील बंधार्याचे काम होऊ नये यासाठी स्थानिक आमदाराने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना सांगून या कामात अडचणी निर्माण केल्या आहेत असा आरोप करत येत्या पावसाळ्यात जर देवबागमधील एकाचा जरी जीव गेल्यास यांच्याविरोधात न्यायालयातून ३०२ चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू. शिवाय यांना मालवणातच काय तर जिल्ह्यातही फिरू देणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी दिला आहे.
ते म्हणाले, देवबाग येथील संरक्षक बंधार्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याला जिल्हाधिकार्यांनी मान्यता दिली असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या बंधार्याचे काम मार्गी लागावे यासाठी पर्यावरण खात्याची परवानगी आवश्यक आहे. मात्र स्थानिक आमदाराने हे काम राणेंचे असल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगून हे काम थांबविले आहे. खालच्या पातळीचे राजकारण ही लोकं करत आहेत. त्यांना लोकांचे जीव महत्त्वाचे नाहीत. या कामाला राणेंनी निधी दिला त्यांना तो वापरता येता नये यासाठी अडचणी निर्माण करण्याचे काम केले आहे. काही झाले तरी हे काम होता नये म्हणून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. ही लायकी स्थानिक आमदार व पर्यटन मंत्र्यांची लाज वाटत नाही. मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतो आपण? याचा विचार त्यांनी करावा. हा राणेंचा विषय नसून देवबागमधील स्थानिक ग्रामस्थांच्या जीविताचा विषय आहे. समुद्राचे पाणी गावात घुसले तर एकही जीव शिल्लक राहणार नाही. यांना लाज आहे की राजकारणासाठी सर्व काही विकून टाकले. अशी टीका त्यांनी केली.
पावसाळ्यात देवबागला समुद्री लाटांचा तडाखा बसून कोणाचा बळी गेल्यास न्यायालयातून यांच्याविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू. एक जरी जीव देवबागातील गेला तर तुम्हाला कोणालाही मालवण तर सोडाच सिंधुदुर्गात फिरू देणार नाही असा इशाराही श्री. राणे यांनी यावेळी दिला.