*कोकण Express*
*बावशी मधील उपोषणाचा दोन दिवसानंतर लागला निकाल*
*बावशीतील रेशनिंग प्रश्नी चाललेलं उपोषण अखेर मागे*
*पुरवठा विभागाच्या लेखी आश्वासनानंतर घेण्यात आला निर्णय*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील बावशी येथील जय मल्हार स्वयं. सहायता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ देण्यात येवू नये, या मागणीसाठी काल सकाळपासून सुरू झालेले उपोषण अखेर आज दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. आज सायंकाळी तहसिलदार आर. जे. पवार व प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी दिप्ती धालवलकर यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला. दिप्ती धालवलकर यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. पालकमंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै रोजी दिलेल्या सुचनेनुसार उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व शासकीय नियम पाळून या विषयासाठी कमिटी स्थापन करण्यात येणार असून गावातील भौगोलिक परिस्थिती काय आहे याचा अंदाज घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
सलग दोन दिवस उपोषण चालू असल्याने काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती. यात बावशी शेळीची वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश रांबाडे यांना त्रास होवू लागल्याने नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.
सायंकाळी उशिरा कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, पुरवठा नायब तहसीलदार जिल्हा कार्यालय, तालुका पुरवठा अधिकारी ममता तांबे, नांदगाव मंडळ अधिकारी विद्या जाधव, नांदगाव तलाठी सुर्दशन अलकुटे आदी शिष्टमंडळाने आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि लेखी स्वरूपात आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या मनश्री कांडर, माजी सरपंच सुप्रिया रांबाडे, सुरेश रांबाडे, दिपक कांडर, हेमंत कांडर, आबू मेस्त्री बावशी पोलिसपाटील मयेकर,तोंडवली पोलीसपाटील विजय मोरये, बावशी माझी पोलीस पाटील कांडार,समीर बोभाटे, संजय नाडकर्णी,सुनील पवार,स्वप्नील कडपे इत्यादी उपस्थित होते.