समाज बदलाचे चिंतन साहित्य करते ;चेअरमन मा.श्रीकांत आपटे

समाज बदलाचे चिंतन साहित्य करते ;चेअरमन मा.श्रीकांत आपटे

*कोकण Express*

*समाज बदलाचे चिंतन साहित्य करते ;चेअरमन मा.श्रीकांत आपटे*

*बदलत्या अभ्यासपत्रिका क्रमांक ८ आधुनिक मराठी साहित्य याची आभासी कार्यशाळा फोंडाघाट महाविद्यालयामध्ये संपन्न*

*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*

साहित्य हे नेहमी समाजाचा आरसा असते. समाजात होणारे सर्वच बदल साहित्य टिपून त्याच्या नोंदी घेते. बदल हा समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते. साहित्याचेपण तसेच असते. अशा बदलत्या साहित्याचे चिंतन करण्याची संधी मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने आमच्या महाविद्यालयाला दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. असे उद्गार फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.श्रीकांत आपटे यांनी काढले. ते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित *बदललेल्याअभ्यासक्रम कार्यशाळा अभ्यासपत्रिका ०८ (आधुनिक मराठी साहित्य)* या विषयाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात जे. एस. एम. कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख तथा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. निळकंठ शेरे यांनी कालानुरूप समाजात झालेले बदल आणि त्याचे साहित्याने घेतलेल्या नोंदी याची चर्चा केली. आधुनिकवाद व उत्तर आधुनिकवादात त्यांची चर्चा करून या वादाचा साहित्याबरोबरच इतर क्षेत्रावर पडलेला प्रभाव याचेही विवेचन केले. समाजकारण, राजकारण ही क्षेत्र प्रभावित झाल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी महाविद्यालयाच्या चढत्या प्रगतीचा आढावा घेतला. ग्रामीण आणि दुर्गम भागात महाविद्यालय असून सुद्धा अनेक शासकीय पुरस्काराने सन्मानित झालेले महाविद्यालय आहे. महाविद्यालयाने *नॅक बी* मानांकन प्राप्त असून लॉकडाऊनच्या काळात सुद्धा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सेमिनार महाविद्यालयाने आयोजित करून अभ्यासक तसेच विद्यार्थ्यांची नाळ सातत्याने जोडून ठेवण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन केले.

बदलत्या अभ्यासक्रमाचे पहिले सत्र प्रा. शिवराज गोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यात डॉ. नानासाहेब यादव यांनी *आधुनिक मराठी कथा मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट* या विषयाचे चिंतन केले. या प्रस्तावित कथासंग्रहातील आधुनिक पैलूंचा आढावा घेतला. कथेचे कथानक, पात्र त्यांनी आधुनिक कास कसे स्वीकारले याचेही चिंतन केले. डॉ. शरयू आसोलकर यांनी *आधुनिक मराठी कादंबरी ‘पुरोगामी ‘* या कादंबरीचे विवेचन केले. कादंबरी सुद्धा आधुनिक प्रसंगाने सजलेली दिसते. पुरोगामी या नावाप्रमाणेच ती कादंबरी पुरोगामी किंवा आधुनिक विचारांनी प्रभावित झाली असून त्याची साक्ष त्याच्या कथानक आणि पात्र देतात.असे प्रतिपादन केले.

दुसरे सत्र प्रा. जालिंदर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्याचे *उत्तर आधुनिक व उत्तर आधुनिक कविता* याचा लेखाजोखा डॉ. गोविंद काजरेकर यांनी घेतला आधुनिकवादानंतर उत्तर आधुनिकवाद आला. जागतिकीकरणाचा समाजावर पडलेला परिणाम हा उत्तर आधुनिकवादात येतो असं सांगून संपूर्ण उत्तर आधुनिकवादाचा उत्तम लेखाजोखा घेऊन कवितेतील उत्तर आधुनिकवाद सांगितला. प्रा.राजरत्न दवणे यांनी *उत्तर आधुनिक नाटक सिंधू सुधाकर, रम आणि इतर* या नाटकाचे विवेचन केले. सिंधू सुधाकर, रम आणि इतर अशा तीन भागांमध्ये नाटकाची चर्चा केली. नाटक गुंतागुंतीचे असले तरी पूर्वीचा काळ आणि आताचा काळ याची सांगड घालण्याचा प्रयत्न लेखकाने उत्तम प्रकारे केला असल्याचे सांगितले.

सदरच्या कार्यशाळेला अधिष्ठाता डॉ. राजेश खरात, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.धनाजी गुरव, अभ्यास मंडळाचे इतर सर्व सदस्य संस्थेचे सचिव मा.मनीष गांधी, खजिनदार मा.समीर मांगले, महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, तसेच मुंबई विद्यापीठातील मराठी विषयाचे अभ्यासक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन सूत्रसंचालन व आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!