*कोकण Express*
*जनतेच्या प्रश्नांवर ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद…*
*परशुराम उपरकर ; मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार करणार…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जनतेच्या प्रश्नांसाठी कणकवली प्रांत कार्यालयात घंटानाद आंदोलन केले, त्यावेळी उपस्थित महिला अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता दिसून आली. त्यांची भूमिका संशयास्पद होती. तसेच लोकांची गाऱ्हाणी सांगायला गेलो तेव्हा त्या महिला अधिकाऱ्यांची वर्तणूक चुकीची होती. त्यांची मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.
मनसे नेते परशुराम उपरकर यांनी ऑनलाइन माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला .यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.
श्री.उपरकर म्हणाले, खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची लूट केली जात आहे.. त्यासंदर्भात जनतेचे आंदोलन होते, आम्ही प्रश्न मांडत असताना त्या महिला अधिकाऱ्यांची सहनशीलता दिसली नाही. हे अधिकारी जनतेचे सेवक असताना असंवेदनशीलता दाखवली. अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नव्हती. स्वतःचे बिल कमी केल्याचे ते सांगत होते.आम्हाला जनतेला दिलासा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.
सध्या तालुका बिल तपासणी प्रमुख श्रीमती पाटील रजेवर आहेत. तोपर्यंत प्रभार वैभववाडी व राजापूर तालुक्यातील पराक्रम केलेल्या अधिकाऱ्याकडे आहे. त्याने भ्रष्टाचार कसा आणि किती वेळा केला हे जनतेला माहीत आहे. वाढीव बिलांची चौकशी यांच्याकडे राहिल्यास गोरगरीब रुग्णांना न्याय मिळणार नाही. पूर्वीची बिले जी अतिरिक्त घेतली आहेत ती परत केली पाहिजेत. एक महिना नव्हे, तर कोविड सुरु झाल्यापासून पूर्ण तपासणी झालीच पाहिजे.अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, त्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो.त्या जनतेच्या भावनेशी खेळत आहेत. जादा रक्कम रुग्णांना परतावा न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणार आहोत. त्या महिला अधिकाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे त्या सहा रुग्णांच्या नातेवाईकांना अद्याप पैसे दिलेले नाही. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. खासगी कोविड रुग्णालयात रुग्णांवर उपचार काय केले? तपासणी काय केली? त्या खासगी रुग्णालयात उपचार पद्धती काय आहे ? याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून आम्ही घेणार आहोत. अनेक रुग्णांना काही रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ रुग्णांना दिला जात नाही. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असून, त्याची प्रत जिल्हाधिकारी यांना देणार असेही परशुराम उपरकर यांनी सांगितले.