फोंडाघाट महाविद्यालयात राजर्षी शाहू घरोघरी अभियान संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात राजर्षी शाहू घरोघरी अभियान संपन्न

*कोकण  Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात राजर्षी शाहू घरोघरी अभियान संपन्न*

*फोंडाघाट ःःगणेश इस्वलकर* 

कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि निर्मिती विचारमंथन मंच कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने *राजर्षी शाहू घरोघरी* या अभियानांतर्गत तीन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न झाली. सदरची व्याख्यांमाला दिनांक 23 जून ते 25 जून 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. यात पहिले पुष्प ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. गिरीश मोरे यांनी गुंफले. बहुपैलू व्यक्तिमत्त्व राजर्षी शाहू महाराज या विषयांतर्गत आपले विचार मांडताना ते म्हणाले की, शाहू महाराजांना राज्य कारभार पाहण्याची संधी फक्त 28 वर्षे मिळाली. तरीही या कमी कालावधीत त्यांनी केलेले सामाजिक समतेचे काम थक्क करणारे होते. त्याना राज्याच्या जनतेच्या सर्व अंगाच्या समस्यांची चांगली उकल होती. त्यामुळे त्यांनी केलेला करवीर नगरीचा विकास हा सर्वांगीण होता. दीनदलित गरीब कामगार शेतकरी स्त्रिया यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांचे निराकरण करण्याची क्षमता शाहू महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचं होती. त्यात सक्तीचे आणि मोफत शिक्षण कायदा तसेच आरक्षणाचा कायदा हा त्यांच्या कारकिर्दीची संपूर्ण सुवर्णाक्षराने लिहावीत अशी कामे असून सामाजिक समता यातून दिसून येते.
दिनांक २४. जून २०२१ रोजी दुसरे पुष्प गुंफताना इतिहास संशोधक डॉ. कपिल राजहंस यांनी ‘छत्रपती शाहू महाराज त्यांच्या काळात पुढे जाऊन भविष्याचा वेध घेणारे जाणकार होते. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची मैत्री भारतीय जातीयतेला मोठी चपराक होती. भारतातील 563 रियासतीत फक्त शाहू महाराज असे राजे होते की ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हत्तीवरून मिरवणूक काढून गौरव केला. ज्या ज्या वेळेस रमाबाई कोल्हापूरला यायच्या त्या त्या वेळेस त्यांना आपल्या बहिणीप्रमाणे शाहू महाराज वागवत असत. महात्मा फुलेंनी जी सत्यशोधक मशाल निर्माण केली होती ती बाबासाहेबांच्या हाती शाहू महाराजांनी सुपूर्त केली वेदोक्त प्रकरणातून धडा घेऊन पाटील प्रशिक्षण शाहू महाराजांनी सुरु केले. कुस्तीचा शौक आणि विकास सर्वश्रुत होते. फेजिवडे येथील बांधलेले राधानगरी धरण पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागासाठी वरदान ठरले . राज्यरोहनानंतर बाराव्या दिवशी शिकारी संबंधी काढलेला अध्यादेश शिवाजी महाराजांच्या प्रजाहित दक्ष अध्यादेशाची समायोजित आहे. असे विचार मांडले.
तिसरे पुष्प गुंफताना डॉ. सतीश कामत यांनी शाहू महाराजांच्या जीवन व कार्य याविषयी आढावा घेताना राजेशाही जीवन असताना सुद्धा त्यांनी सर्वसामान्य दलित जनतेसाठी केलेल्या कामामुळे खर्‍या अर्थाने जनतेचे राज्य झाले. शेता बांधावर स्वतः जाऊन त्यांचे जीवन अनुभवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण जवळून त्यांना झाली राधानगरी धरण बांधून शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. दलितांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या बरोबर जेवण घेतले. त्यांनी भाजी भाकरी खाल्ली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी असलेले स्नेहाचे संबंध हे त्यांच्या बुद्धीचा केलेला सन्मान होता. रमाबाईंशी बहिणीचे नाते जोडले. त्यामुळे सामाजिक समतेचे महाराजांनी केलेले काम हे मानवतावादी होते. अशी नोंद इतिहासाने घेतली आहे. आपल्या करवीरनगरीत त्यांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक सोयी, वसतिगृहांची सोय, धर्मशाळा, सार्वजनिक पाणवठे यामुळे शाहू महाराज रयतेचे राजे झाले. असे प्रतिपादन त्यांनी केले.
सदरच्या व्याख्यानमालेसाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक वर्ग विद्यार्थी व इतर नागरिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!