*कोकण Express*
*बीजेपी पक्षासोबत आपली युती तोडून आपल्या मंत्रीपदाचा त्वरीत राजिनामा दयावा…*
*केंद्रीय मंत्री आठवलेंना आरपीआय (आठवले ) गटाचे जिल्हाध्यक्ष रतन कदम यांचा घरचा आहेर*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
आर. पी. आय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आर. पी. आय. कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे. बीजेपी पक्षासोबत आपली युती तोडून आपल्या मंत्रीपदाचा आपण त्वरीत राजिनामा दयावा, अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राजिनामा देण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दर्शवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राजिनाम्याची सुरुवात झाली की हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रातून आर. पी. आय. पक्षाचे कार्यकर्ते राजिनामा देण्याची सुरुवात करतील, कारण बीजेपी पक्षासोबत आम्ही कधीही काम करू शकत नाही, असे म्हणत आर. पी. आय. (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना घरचा आहेर दिला आहे.
ज्या आर. एस. एस., बी. जे. पी. पक्षाने नेहमीच आमच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या व चळवळीच्या विरोधात व भारतीय घटना संविधानाच्या विरोधात काम केले आहे, त्याच भाजपा पक्षाशी आठवलेंनी युती केल्याने पक्षाचा निष्यवंत कार्यकर्ता व आंबेडकरी जनतेच्या मनातून रामदास आठवले यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. आतापर्यंत पक्षाचा कार्यकर्ता नेहमीच गप्प राहिला. परंतु आता बोलण्याची वेळ आली आहे. पक्षाचे काम करताना स्वतःची लाज वाटू लागली आहे. भारताच्या अनेक राज्यातून व महाराष्ट्रातून भाजपाच्या लज्जस्पद गोष्टींना विरोध होत असतानाही आर. पी. आय. पक्षाचे कार्यकर्ते गप्प राहून तमाशा आहोत. अशी लाचारी आम्ही कार्यकर्त्यांनी पूर्वी कधी केली नाही व या पुढेही कधी करणार नाही. आम्ही कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी व त्यांच्या चळवळीशी व आंबेडकर जनतेशी एकनिष्ट असून आमचे आयुष्य आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी जोडले आहे. तरी आपण आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून आंबेडकर चळवळीचे नेते आहात. तरी आपण लवकरच भाजपाशी युती तोडून आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजिनामा दयावा. अन्यथा आपल्या विरोधात निदर्शने करण्यात येतील, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आर. पी. आय. जिल्हा अध्यक्ष रतन कदम यांनी रामदास आठवले यांना दिला आहे. यांच्या सोबत आर. पी. आय. पक्षाचे पदाधिकारी अंकुश जाधव, मधुकर मळेवाडकर, विजय तुळसकर, अमर जाधव, सिद्धार्थ जाधव, केशव जाधव, रमाकांत परूळेकर, संदीप पिंगूळकर व आदी पदाधिकारी उपस्थित होते.