*कोकण Express*
*वैभव नाईक आमदार कमी गावगुंड जास्त शोभतात*
*जि. प. गटनेते रणजित देसाई यांची खरमरीत टिका*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळमध्ये केलेला राडा सगळ्यांनी पाहिला. खरतर, वैभव नाईक हे आमदार कमी आणि गावगुंड जास्त शोभतात. कारण एवढं मोठं कृत्य एका लोकप्रतिनिधीकडून होवू शकत नाही, तर एका गावगुंडाकडूनच होवू शकतं, अशी खरमरीत टिका जि. प. गटनेते रणजित देसाई यांनी आम. वैभव नाईक यांच्यावर केली आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांचा निघाला. तेव्हा त्याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी यावर आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांच्या अंगावर धावून जात राडा सुरू केला. आम. वैभव नाईकही या हाणामारीत सहभागी झाले होते. शिवसेनेच्या वर्धापनदिनी वैभव नाईक यांनी केलेले हे कृत्य अतिशय निंदनीय आहे. ८० % समाजकारण आणि २०% राजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. परंतु शिवसेनेत नव्याने आलेल्या वैभव नाईक यांना शिवसेनेची ही संस्कृती माहित नाही. म्हणूनच त्यांनी गुंडांसारखा कुडाळमध्ये धिंगाणा घातला आहे. परंतु भाजपा च्या कार्यकर्त्यांनी त्यांना चोख प्रत्युउत्तर दिलेले आहे. त्यामुळे वैभव नाईक यांना आपला इच्छित कार्यक्रम अर्धवट सोडून पळ काढावा लागला आहे, असे रणजित देसाई म्हणाले.
आम. वैभव नाईक यांनी केलेले कृत्य अशोभनिय आणि हिंसक असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. गुन्हा दाखल करतेवेळी पोलिसांवर मातोश्रीवरून दबाव येण्याचीही शक्यता आहे. परंतु या अपप्रवृत्तीला आळा घालणं गरजेचं आहे आणि या कृत्याचं जिल्हावासियांनी निषेध केला पाहिजे, असेही रणजित देसाई यांनी म्हटले आहे.
