कारभाराच्या चौकशीची मागणी

कारभाराच्या चौकशीची मागणी

*कोकण Express*

*कारभाराच्या चौकशीची मागणी!*

*गंभीर रुग्णाच्या ई-पासच्या बाबतीत असंवेदनशील यंत्रणेने घातला गोंधळ!*

*भाजपा नेते रणजित देसाई यांच्या तत्परतेमुळेच वाचला प्राण! : अविनाश पाटील*

ईपास यंत्रणेमुळे गंभीर रुग्णाच्या जीवावर बेतले होते, पण भाजपा नेते रणजित देसाई यांच्या मदतीमुळे आमच्या सहकाऱ्याचा जीव वाचला, असे मत भावनाविवश होत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री अविनाश पाटील यांनी व्यक्त करत देसाई यांचे व्यक्तीश: तसेच संघटनेतर्फे आभार मानले आहेत. रणजित देसाई हे अनेकदा अडचणीतील रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत, आज पुन्हा एकदा त्यांच्या जनतेसाठी धावून जाण्याच्या स्वभावाचा प्रत्यय आला.

सविस्तर वृत्त असे की कुडाळ तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी श्री.मनिष सडवेलकर यांना आठ दिवसापूर्वी हार्ट अटॅक आला होता. दोन दिवसापूर्वी त्यांची पडवे हाॅसपीटल येथे एन्जीओग्राफी झाली होती. त्यांना बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर येथे जाण्यास सांगितले गेले. ई-पाससाठी त्यांनी रीतसर ऑनलाइन अर्ज केला. सर्व आवश्यक पेपर जोडले व अर्ज सबमीट केल. सर्व चेक करून त्यांना टोकन नंबर दिला गेला पाच मिनिटात प्रिंट घेता येईल, असे सांगितले गेले. त्यानंतर पाच मिनिटांनी सांगितले गेले की हि RTPCR टेस्ट खाजगी दवाखान्यातील आहे. वास्तविक त्यानी ती टेस्ट पडवे हाॅस्पीटल येथे केली होती. पण तुम्ही पुन्हा ती सरकारी दवाखान्यात करा, त्यांचा तीन दिवसानी रिपोर्ट मिळेल व नंतरच मग पास मिळेल असे सांगितले गेले. हे ऐकताच रुग्णाचे नातेवाईक सुन्न झाले. काय करायचे तेच त्यांना सुचेना. कारण जिथे उद्याच्या उद्या त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते, तिथे ती आशाच ई-पासच्या गोंधळात संपुष्टात येत होती. अखेर नातेवाईकानी संघटनेचे अध्यक्ष श्री अविनाश पाटील यांना संपर्क करून अडचण सांगितली. घटनेचे गांभीर्य जाणून त्यांनीही लगेचच हि परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री.रणजित देसाई यांना कळवली. देसाई यांनीही ताबडतोब पुढची सगळी माहिती घेऊन संपर्क केला आणि अर्ध्या तासात सदर रुग्णासाठी इ-पास
मिळवून दिला. या तत्परतेने रुग्णाला पुढे प्रवास करून कोल्हापूरला हॉस्पिटलमध्ये वेळेत उपचार घेणे शक्य झाले.

श्री अविनाश पाटील यांनी बोलताना खंत व्यक्त केली की आज आम्ही संपर्क केला आणि आमच्यासाठी रणजित देसाई धावून आले. परंतु ज्यांच्याकडे कुणीच नाही, ज्यांची ओळख नाही, पोहोच नाही अशा सर्व सामान्य लोकांच काय? ई पास देणा-यानी अधिकार हाती आहेत म्हणून लोकांच्या जीवाशी खेळ करु नये. ई पास यंत्रणेतल्या अशा असंवेदनशील कारभाराची चौकशी होणे गरजेचे आहे, यापुढे कोणाच्याही बाबतीत असा जीवघेणा प्रकार होऊ नये, असे कुडाळ तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी म्हंटले आहे. तसेच वेळेची गरज ओळखून या जोखमीच्या काळात सहकार्य केल्याबद्दल रणजित देसाई यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!