*कोकण Express*
*मुंबईतील चाकरमान्यांना तौक्ती चक्रीवादळाची नुकसान भरपाई मिळावी*
*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात वादळाचा फटका बसून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवरील तालुक्यातील घरांची, झाडांची पडून हानी झाली आहे. तसेच अन्य नुकसानही झालेले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने केलेत. या पंचनाम्यावरती मालकांच्या सह्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या सही शिवाय त्यांची नुकसान भरपाई मिळणे अवघड आहे. मात्र जे लोक मुंबईला राहतात, त्यांना जमिनीचे तलाठी सही करण्यासाठी फोन वरून बोलावत आहेत. परंतु त्यांना लोकडाऊन काळात पंचनाम्यावर सही करण्यासाठी ई-पास मिळत नसल्याने जिल्हयात येऊ शकत नाहीत. त्यामुळे याचा विचार करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी माजी आमदार व मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
सध्या सगळीकडे कोरोनाचा कहर चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तर रेड झोन मध्ये जावून पोहोचलाय. हे सारं असताना चाकरमानी गावी येवून राहणे उचित होणार नाही. त्यामुळे त्यांना या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येईल. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने यावरती उपाययोजना करून मुंबईतील चाकरमानी त्यांच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.