*कोकण Express*
*मोदींच्या कार्याकाळात देश महासत्ता होवो*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला तो दिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे.मोदी आपले पंतप्रधान आहेत हे सांगताना आपणाला अभिमान वाटतो. त्यांनी सात वर्षे पूर्ण केली यापेक्षा त्यांच्या कार्यकाळातील त्यांचं काम व कार्य हे अतुलनीय आहे. देशातील इतर पंतप्रधानां बद्दलही आपल्याला आदर आहे. त्यांनी ही चांगलं काम केलं आहे मात्र पंतप्रधान मोदींनी भारत देशाचे नाव जगभरात नेले आहे. हा देश महासत्तेकडे नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न फारच वाखाणण्याजोगे आहेत. असा कतृत्ववान पंतप्रधान आपल्याला लाभला हे आपले भाग्य आहे. यापुढेही त्यांचं कार्य असच सुरु राहो व हा त्यांच्या नेतृत्वात देश महासत्ता होवो, अशा शब्दात भाजपचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याप्रती सद्भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताह साजरा होत आहे. या सेवा सप्ताह निमित्त स्वतःचा जीव धोक्यात घालून व तन मन धन अर्पण करून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या सावंतवाडीतील कोरोना योद्ध्यांचा खा. नारायण राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी कोविड योद्ध्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, नगरपालिका गटनेते राजू बेग, न.प.सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, माजी सभापती परीमल नाईक, संदीप कुडतरकर जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, नगरसेवक आनंद नेवगी, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, परिणीती वर्तक आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवेदनशील व्यक्ती आहेत. देशावर व देशातील जनतेवर त्यांचं अपार प्रेम आहे. त्यामुळेच कोरोना काळातील काही घटनांमुळे ते व्यथित व भावूक होतात. पुढारी व नेते अनेक होतात मात्र देशातील जनतेप्रती आपुलकी व आस्था असणारे मोदींसारखे पंतप्रधान क्वचितच घडतात. मोदींचं काम व कार्य त्यांचा त्याग वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे त्यांच्या सारखा पंतप्रधान आपल्याला लाभला हे आपलं भाग्य असून ते टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे. पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेले कार्य महान आहे. त्यांनी स्वच्छ भारत योजना राबविली, घटनेचा अनुच्छेद अर्थात काश्मिरमधील ३७० कलम हटविण्याच अशक्यप्राय काम त्यांनी केलं. भारत देश गरीब व मध्यमवर्गीय आमचा देश आहे त्यामुळे या देशात आर्थिक समानता यावी यासाठी जीएसटी करा सारखा चांगला निर्णय त्यांनी घेतला. देशभरात रस्त्यांचं जाळ विणल. परराष्ट्रीय धोरणाचा अवलंब करीत त्यांनी अमेरिका इस्रायल सारख्या देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले. त्यांची कष्ट करण्याची तयारी व मेहनत यामुळे त्यांनी देशात विविध पोषक व महत्वपूर्ण योजना राबविल्या. त्यांच्या या कार्यामुळेच आज जगभरात त्यांच्याकडे आदराने पाहिलं जात आहे हा भारतीयांचा सन्मानच आहे असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. आज कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही अनेकांचे या आजारामुळे बळी गेले आहेत. मात्र हा मृत्यू दर कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केलेले कार्य फारच महत्वाचे आहे. देशात औषधोपचारासाठी त्यांनी केलेले प्रयत्न तसेच जगभरात इतर देशांशी संबंध ठेवून लसिकरणासाठी केलेले कार्य यामुळे देशातील मृत्युदर नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे ज्या मुलांचे दोन्ही पालक त्यांनी गमावले अशा मुलांसाठी त्यांनी तयार केलेली निराधार योजना त्या मुलांच्या भवितव्यासाठी फारच उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळेच त्यांच्या या कार्यात त्यांचे हात बळकट करण्यासाठीच अशा सेवा सप्ताहाचे आयोजन केले जाते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.