अवधुताश्रमचे संस्थापक अवधुतानंद सरस्वती महाराज यांचे दुःखद निधन

अवधुताश्रमचे संस्थापक अवधुतानंद सरस्वती महाराज यांचे दुःखद निधन

*कोकण  Express*

*अवधुताश्रमचे संस्थापक अवधुतानंद सरस्वती महाराज यांचे दुःखद निधन*

*अध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रातील मोठं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड*

*बांदा ःप्रतिनिधी*

येथील साईभक्त कै. बाप्पा केसरकर यांचे नातु श्री अवधुतानंद सरस्वती महाराज यांचे नुकतेच तेलंगणातील पेराम्बूर येथे दुःखद महानिर्वाण झाले. बांदा शहरातुन तेलंगणा येथील पेरांबुर येथे जाऊन अवधुताश्रम त्यांनी निर्माण केला. या आश्रमाच्या माध्यमातून ते धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या निर्वाणामुळे सावंतवाडी आणि बांदा परिसरात तसेच त्यांच्या समस्त भक्तपरिवारात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचे मूळ नाव दयानंद पिळणकर. बांदा परिसरात ते दया महाराज नावाने ओळखले जात. सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. एक हुशार विद्यार्थी असा त्यांचा नावलौकिक होता. शिक्षण पूर्ण होताच अचानक ते अध्यात्माकडे वळले. विविध भाषेत त्यांनी गुरु चरित्रे लिहिली. आपल्या मुळगाव असलेल्या बांद्यावर त्यांचे फार प्रेम होते व ते वेळोवेळी बांद्यातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांची प्रेमाने माहिती घेत बांद्यातील साईमठाच्या विविध उपक्रमांबाबत ते वेळोवेळी मार्गदर्शन करत.
यांचा भक्तपरिवार खूप मोठा आहे. अगदी ठिकठिकाणी स्वामींचे मठ स्थापन करण्यात आले आहेत. अनेक जण स्वामी समर्थांचे सकारात्मक अनुभव आल्याचे आवर्जुन सांगत असत. श्री क्षेत्र गाणगापूरला त्यांनी उग्र अनुष्ठान आरंभले. या बाल ब्रह्मचारी साधूची ती भक्तियुक्त पण कठोर साधना, तपश्चर्या पाहून श्री क्षेत्र काशीतील लहानथोर, विद्वान पंडित, आबालवृद्ध आश्चर्यचकित झाले. सर्वजण त्यांना विनम्रभावाने नमस्कार करू लागले; त्यांचे ‘श्री अवधुतानंद सरस्वती महाराज असे नूतन नामकरण केले.
पायी खडावा, कटीला कौपीन अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्त्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज, हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री अवधुतानंद सरस्वती महाराज सर्वांना साक्षात श्री अवधुतानंदच वाटत. त्यामुळे संन्याशांसह सर्वतेलंगणवासीय श्री अवधुतानंद सरस्वती महाराज स्वामींना विधियुक्त वंदन करीत. अत्यंत विनयाने, प्रेमाने त्यांना शरण येत. त्यांच्या दर्शनाने सर्व धन्य होत. कृतार्थ होत. या वास्तव्यात त्यांना अनेक शिष्य लाभले. निरनिराळ्या तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. त्यांच्या भोवती भाविकांचा अक्षरश: गराडा असे. ते लोकांच्या आधिव्याधी हरण करीत. त्यांनी केलेल्या अभूतपूर्व चमत्कारांनी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेकांना त्यांनी सन्मार्गाला लावले. उत्तरोत्तर त्यांचा भक्तपरिवार वाढतच गेला. तेलंगणा येथील पेरांबुर येथे श्री अवधुतानंद सरस्वती महाराज यानी जवळजवळ ३५ वर्षे वास्तव्य करून दीनदुःखितांचा उद्धार केला असल्याने पेरांबुरास दत्तपंथीयांत फारच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!