*कोंकण एक्सप्रेस*
*आंबा-काजू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीचे मुख्यमंत्र्यांचे अर्थखात्याला निर्देश*
*मंत्री नितेश राणे,मंत्री उदय सामंत यांनी राज्यमंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मदत वाढवून देण्याकडे वेधले लक्ष*
*शेतकऱ्यांच्या तीव्र भावना मुख्यमंत्र्याकडे मांडत केली आणखी मदतीची मागणी*
*महायुती सरकार आंबा व काजू शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकतीने आहे हे कृतीतून दिसेल*
*मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास*
*कणकवली ः संजना हळदिवे*
आंबा व काजू शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत वाढवता कशी येईल, जास्तीत जास्त कशी करता येईल यावर लवकरात लवकर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित केले आहेत.अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना सुद्धा दिल्या आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमचं महायुतीचं सरकार आंबा व काजू उत्पादकांच्या बरोबर पूर्ण ताकतीने उभ आहे, हे शब्दांपलीकडे कृतीतून निश्चित पद्धतीने दिसून येईल.असा विश्वास मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंबा व काजू शेतकऱ्यांना नुकसानीची जाहीर केलेली मदत फारच कमी आहे. आणखीन मदत केली जावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री उदय सामंत, मी व अन्य मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आंबा व काजू उत्पादकांना राज्य शासनाने काही दिवसा अगोदर जी मदत जाहीर केली होती त्याबद्दल लोकांच्या असलेल्या तीव्र प्रतिसादाबद्दल माहिती दिली.असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असे सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार प्रत्येक झाडा मागे शेतकऱ्यांना फक्त २२० रुपये मिळत आहे. ही मदत अतिशय तूटपुंजी आहे. आणि कधी मदत न मागणाऱ्या आंबा काजू शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकारने उभे राहिले पाहिजे अशी मागणी केली.त्यावर तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याच्या संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत.असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

