*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून कणकवली शहरासाठी १२.६० कोटींचा निधी मंजूर!*
*सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादाचे राजकारण थांबवावे; माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, बंडू हर्णे यांचा घणाघात*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सत्तेत असताना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करून विविध विकासकामांचे प्रस्ताव दिले होते. या प्रयत्नांना यश आले असून, २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा नियोजन, रस्ते विकास आणि नगरोत्थान निधीतून १२ कोटी ६० लाख ४३ हजार रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, या कामांचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी मंडळी सध्या भूमिपूजनांचा धडाका लावत आहेत, असा आरोप माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला आहे.
समीर नलावडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मंजूर झालेल्या कामांची सविस्तर यादीच सादर केली.
महत्त्वाची मंजूर विकासकामे:
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून शहरातील विविध प्रभागांत कामे होणार आहेत. त्यातील काही प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत:
रस्ते व भू-संपादन: कणकवली-टेंबवाडी ते रवळनाथ मंदिर (डी.पी. रस्ता) भू-संपादनासाठी १ कोटी रुपये. तेलीआळी रस्ता रुंदीकरण, परबवाडी रस्ता नूतनीकरण आणि बांधकरवाडी रस्ता बांधकाम.
सुशोभीकरण: माऊली नदी परिसर सुशोभीकरण (५३.१० लाख), छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर सुशोभीकरण (४० लाख) आणि नगरपंचायत हद्दीत बगीचा सुशोभीकरण (१.५० कोटी).
नागरी सुविधा: बाजारपेठ स्मशानभूमी नूतनीकरण (१६ लाख), जळकेवाडी स्मशानभूमी संरक्षक भिंत व शेड (५० लाख), मराठा मंडळ येथे गणेशघाट बांधणे (७० लाख) आणि नगरपंचायत सभागृह नूतनीकरण (५० लाख).
पायाभूत सुविधा: विविध ठिकाणी सोलार हायमास्ट व पथदीप (५५ लाख), क्रीडा सुविधा केंद्रात वुडन कोर्ट व मॅट (३० लाख) तसेच शहराच्या विविध भागात गटर व संरक्षक भिंतींची कामे.
’१०० कोटींचा निधी आणल्यास कौतुकच करू’
यावेळी बोलताना बंडू हर्णे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि नितेश राणे यांच्या सहकार्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडली होती, त्याचा फायदा घेत सत्ताधारी आता या कामांचे श्रेय लाटत आहेत. जर सत्ताधाऱ्यांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी स्वतःच्या हिमतीवर १०० कोटींचा नवीन निधी आणून दाखवावा, आम्ही त्यांचे जाहीर कौतुक करू.”
केवळ नारळ फोडून विकास होत नाही, तर त्यासाठी योग्य नियोजन आणि पाठपुरावा करावा लागतो, असा टोलाही यावेळी माजी नगराध्यक्षांनी लगावला.

