मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह उद्यापासून प्रवास सुरू*

*मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ!*

*मुंबई दि. २८ :*

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. उद्या, रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता मुंबईतील भाऊचा धक्का येथे या सेवेचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर ही बोट विजयदुर्गकडे प्रस्थान करणार असून, या प्रवासासाठी प्रवाशांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. पहिल्याच दिवशी विविध श्रेणींमधून जवळपास सर्वच तिकीट बुकिंग होत आली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे की, सुमारे ६२६ प्रवासी आणि मोठ्या संख्येने वाहने वाहून नेण्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक रो-रो जहाज मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण करणार आहे. सुरक्षित आणि आरामदायी समुद्रप्रवासासोबतच पर्यटकांना कोकणचा विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा अनुभवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. ही सेवा महाराष्ट्राच्या सागरी वाहतुकीच्या इतिहासातील एक नवीन आणि वैभवशाली अध्याय ठरणार असून, भविष्यात या सेवेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. कोकणाला वेगवान कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि राज्याच्या सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर प्रत्यक्षात साकार झाला आहे. या प्रतिसादाबद्दल बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, कोकणवासीयांनी या सेवेचे केलेले स्वागत हे या प्रकल्पाच्या यशाची पावती आहे. या सेवेमुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल. उद्याच्या पहिल्या फेरीसाठी झालेल्या बुकिंगच्या तपशिलानुसार, सर्वाधिक पसंती इकोनॉमी श्रेणीला मिळाली असून प्रीमियम श्रेणी, बिझनेस श्रेणी आणि प्रथम दर्जा (फर्स्ट क्लास) श्रेणीत देखील प्रवाशांनी आपले स्थान आरक्षित केले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी ₹३,००० पासून ₹९,००० पर्यंतचे विविध तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. केवळ प्रवासीच नव्हे तर वाहनांच्या वाहतुकीसाठीही या सेवेला उत्तम प्रतिसाद लाभला असून, पहिल्याच दिवशी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. या प्रतिसादावरून मुंबई-कोकण प्रवासासाठी ही सेवा किती आवश्यक आहे हे स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!