*कोंकण एक्सप्रेस*
*उपोषणासमोर प्रशासन झुकले..! नितीन हरमलकर यांच्या लढ्याला यश*
*कणकवली (ओरस) ः संजना हळदिवे*
पारदर्शकता आणि हक्काच्या माहितीसाठी प्रजासत्ताक दिनी पुकारलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी झाले आहे. शिवडाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन हरमलकर यांच्या सर्व मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेले संभाजी खाडे यांच्या नियुक्तीच्या वैधतेबाबत नितीन हरमलकर माहिती मागत होते. मात्र, वारंवार टाळाटाळ आणि चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप करत त्यांनी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आमरण उपोषणाचे’ हत्यार उपसले.
सकाळी ८:००: उपोषणाला सुरुवात.दुपारी ३:००: महसूल अधिकाऱ्यांचा ‘थातूरमातूर’ प्रस्ताव, हरमलकर यांनी तो ठामपणे फेटाळला.रात्री ८:००: प्रशासनाची धावपळ; जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मागणीनुसार सर्व कागदपत्रे स्वाधीन केली.कागदपत्रांची पडताळणी करून समाधान झाल्यावरच हरमलकर यांनी उपोषण मागे घेतले.
”लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला तर विजय निश्चित मिळतो, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
यावेळी तानाजी सावंत, शिरसाट, नाथा सावंत, राजा ठाकूर, वाळवे, कदम यांसह शिवडाव आणि परिसरातील अनेक ग्रामस्थ हरमलकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.

