*कोंकण एक्सप्रेस*
*हिंदू कोड बिल हे महिलांच्या संरक्षणासाठी होते*
*प्रा. सीमा हडकर-तांबे : कणकवलीत ‘सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्यावर व्याख्यान*
*कणकवली ः संजना हळदिवे*
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागामुळे स्त्रियांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे स्त्रियांनी सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची ज्योत कायम तेवत ठेवली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले हिंदू कोड बिल हे महिलांच्या संरक्षणासाठी होते, असे मत प्रा. सीमा हडकर-तांबे यांनी व्यक्त केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डीएवाय एनयूएलएम, बालकल्याण विभाग, कनक सिंधू शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने न. पं. च्या बहुउद्देशीय सभागृहात ‘सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य’यावर आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रा. हडकर-तांबे बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, न. पं. प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, नगरसेवक सुशांत नाईक, जयेश धुमाळे, संकेत नाईक, नगरसेविका सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, शहर समन्वयक जयश्री ठाकरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, मनोज धुमाळे, माजी नगरसेविका विशाखा कांबळे, अॅड. सुदीप कांबळे, किशोर कदम, दिव्या साळगावकर, प्रिया सरुडकर आदी उपस्थित होते.
प्रा. हडकर-तांबे म्हणाल्या, स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांवर अनेक सामाजिक बंधणे होती. या बंधनांतून बाहेर काढण्याचे काम समाजसुधारकांनी केले. त्याकाळी स्त्रीही साहित्यातून अभिव्यक्त होत होती. सावित्रीबाई फुले या साहित्यिका होता. मात्र, त्यांनी लिहिलेले साहित्य प्रकाशझोतात न आल्याने त्यांचे विचार समाजात फारसे रुजले नाहीत. त्यांनी लिहिलेले साहित्य समाजात आल्यास स्त्री-पुरुष समानता येईल, या भीतीने काही मंडळींनी त्यांचे साहित्य समाजात जाणीवपूर्वक येऊ दिले नाही. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंची साहित्यिकाही ओळख फुसली गेली. सावित्राबाई फुलेंनी मुलींना विद्याज्ञानाचे कार्य करून समाजात स्त्रियांना मानाचे स्थान प्राप्त करू दिले. फुले दाम्पत्याचे समाज परिवर्तनाचे कार्य आधुनिक युगातील स्त्रियांनी पुढे नेले पाहिजे. कारण फुले दाम्पत्याला समाज परिवर्तनाचे कार्य करताना अनेक आव्हाने, संकटांचा सामना करावा लागला होता. फुले दाम्पत्याच्या त्यागामुळे स्त्रियांना खºया अर्थाने समानतेचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे स्त्रियांना समानतेच्या स्वातंत्र्याचा उपयोग योग्यरित्या करून स्त्री सक्षमीकरणाची चळवळ अधिकधिक वृद्धिंगत करून समाजाचा स्त्रियांप्रति असलेला सनातनी दृष्टिकोन बदलण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

