*कोंकण एक्सप्रेस*
*चक्रीवादळाचा फटका.. ! दोडामार्ग तालुक्यात भातशेती पाण्यात, शेतकऱ्यांवर संकटाची घोंघावलेली सावली..!*
*दोडामार्ग / शुभम गवस*
: चक्रीवादळानंतर सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचून भात शेती कुजली असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे.
गिरोडे येथील शेतकरी विनायक रामा गवस यांनी आपल्या शेतीचे झालेले प्रचंड नुकसान शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्याकडे मांडले. याबाबत गणेशप्रसाद गवस यांनी क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी सुरू असून पंचनामे वेगाने करण्यात येत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५०,००० ची भरपाई देण्याची घोषणा केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी याचाही लाभ घेणार आहेत.
शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची योग्य नोंद घेऊन भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या संकटात तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

