*कोंकण एक्सप्रेस*
*मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडणार – आमदार निलेश राणे*
*मालवण दि प्रतिनिधी*
कोकणात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडणार असल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.
कोकणामध्ये पावसाचा हंगाम संपल्यानंतर ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने शेती आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने भात, आंबा आणि नाचणी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आणि बागायतदार वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
एका बाजूने पावसाने रडवले तर दुसरीकडे हत्तीच्या वावरामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. भात पीक कुजून गेलं, कापणी करून वाळत घातलेल्या भातालाही कोंब फुटू लागला, काही ठिकाणी धानाच्या पेंडी पाण्यामध्ये तरंगत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही व्यथा कळवणार आहे. भेटीसाठी वेळ ही मागणार आहे. कारण कोकणातल्या शेतीबद्दल आणि झालेल्या नुकसानी बद्दल जास्त काही मीडियावर येत नाही. पण आमचा सरकारवर विश्वास आहे की या अडचणीच्या काळात आमच्या शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलासा मिळेल. अशी भुमिका आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केली आहे.

