*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली तालुक्यातील कासार्डे दक्षिण गावठण येथील वहिवाटीचा रस्ता सार्वजनिक रहदारीस बंद.ग्रामस्तांना प्रचंड मनस्ताप*
*कासार्डे प्रतिनिधी;
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील वहिवाटीचे रस्ते आडवाअडवीचा प्रश्न सोडविण्यासाठी दिनांक २९/८/२५ शासन निर्णय क्रमांक लवेसु-२०२५/प्र.क्रं.४५८/भूमापन (ल१)या मा.राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाने, महसूल व वनविभागा मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात आदेश निर्गमित केले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्रातील गावागावात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक प्रभागात ग्रामस्थांच्या सभा घेऊन सरपंच, सदस्य, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत येथील वहिवाटीच्या रस्त्यांबाबत चर्चा करून. या वहीवाटीच्या रस्त्यांची सविस्तर,वस्तुनिष्ठ माहिती घेऊन मागणीची नोंद करण्यात आली.
सदर आदेश व कार्यपद्धती नुसार दक्षिण गावठण – वरचा आवाट येथे प्रभागामधील ग्रामस्थांची सभा घेण्यात आली या वाडितील विविध वहिवाटीच्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायत सदरी नोंद होण्यासाठी विनंती अर्ज करण्यात आला.
गुरुवारी दसऱ्या दिवशी संध्याकाळी वाडीतील सर्व मंडळी सोने लुटण्याच्या कार्यक्रमासाठी ग्रामदेवता महालक्ष्मीच्या मंदिरात गेले असताना, वाडीतील सुनील भिकाजी पाताडे यांनी आमदार फंडातून खडीकरन-डांबरीकरण झालेला वहिवाटीचा रस्ता अचानकपणे पत्रा लावून बंद केला. तसेच सुनील पाताडे दिवसभर रस्त्यावर खुर्ची टाकून बसून असतात, रस्ता मोकळा करण्या साठी विनंती किंवा संवाद करण्याचा प्रयत्न केल्यास सुनील पाताडे व त्यांची पत्नी अश्लील व दादागिरीचे शब्दप्रयोग करतात त्यामुळे वाडीतील ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप व गैरसोय झाली आहे.
ग्रामस्थांची वाहने राहत्या घरापासून दूर अंतरावर उभी केली आहेत. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामपंचायत, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी या प्रकरणात लक्ष घालून ही अडचण दूर करावी, व आमचा वहिवाटीचा रस्ता रहदारीसाठी कायमचा मोकळा करून द्यावा. अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

