*कोंकण एक्सप्रेस*
*महायुतीत कोणताही वाद नाही : एकत्र बसल्यावर हे सर्व वाद सुटतील*
*महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महायुतीत कोणताही वाद नसून, फक्त समन्वय समितीच्या बैठका वेळेवर न झाल्याने काही कुरबुरी आहेत, अशी कबुली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. एकत्र बसल्यावर हे सर्व वाद सुटतील, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुल्या मनाचे असून ते नाराज असूच शकत नाहीत, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
बुधवारी सायंकाळी उशिरा आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील घरी बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी केसरकर यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बैंक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, बबन राणे, बाबू कुडतरकर, गणेशप्रसाद गवस, सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात महायुतीमध्ये काहीतरी वाद आहेत, असे चित्र रंगवले जात आहे, मात्र प्रत्यक्षात कोणताही वाद नाही. पालकमंत्री पदावरून कोणीही नाराज नाही. मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यात ज्याला पाठवतात, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ध्वजारोहण करायचे असते. पण नाराज असल्याचे दाखवले जाते. याचे कारण फक्त वेळेवर समन्वय समितीच्या बैठका झाल्या नाहीत. या बैठका झाल्यानंतर सर्व वाद मिटतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.