*मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात १३ ऑगस्टला शिवसेना कुडाळमध्ये करणार चक्काजाम आंदोलन

*मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात १३ ऑगस्टला शिवसेना कुडाळमध्ये करणार चक्काजाम आंदोलन

*कोंकण एक्सप्रेस*

*मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात १३ ऑगस्टला शिवसेना कुडाळमध्ये करणार चक्काजाम आंदोलन*

*मा.आम.वैभव नाईक, परशुराम उपरकर, संदेश पारकर, सतीश सावंत यांची माहिती*

मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. खरंतर हा महामार्ग अकरा वर्षांपूर्वी सुरू झाला मात्र सद्यस्थितीत या महामार्गाला जीवघेणे खड्डे पडले आहेत, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. हा महामार्ग रखडण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सुद्धा जबाबदार आहेत. गणेशोत्सव सण काही दिवसांवर आला आहे. दरवर्षीप्रमाणे हजारोंच्या संख्येने मुंबईतील चाकरमानी कोकणात येणार आहेत त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये आणि या महामार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवार दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ तालुक्यात मुंबई गोवा हायवेवरील हुमरमळा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तरी जिल्ह्यातील जनतेनेही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

कुडाळ एमआयडीसी येथे आज सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मा. आ.वैभव नाईक बोलत होते. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, बाबल गावडे,दीपक गावडे आदी उपस्थित होते.

वैभव नाईक पुढे म्हणाले, संपूर्ण देशामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक रस्ते केले परंतु अकरा वर्षे झाली तरी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही.याला नितीन गडकरी सुद्धा जबाबदार आहेत.कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेले आहेत,अनेक ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट केल्यामुळे रस्त्याची पडझड होत आहे. तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा महामार्ग मागील गणेशोत्सवात पूर्ण होईल असे सांगितले होते मात्र आता दुसऱा गणेशोत्सव आला तरी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. आणि पुढील एक वर्ष काम पूर्ण होणार नाही अशी स्थिती आहे.

यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गावरून फेरफटका मारला आणि खड्डे बुजवले जाणार असे सांगितले होते. त्यानंतर रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री झाले पण या दोन्ही मंत्र्यांच्या कालावधीत महामार्गाचे काहीच काम झालं नाही.आता पण पालकमंत्री तसेच सांगत आहेत, की खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. खड्डे बुजवीत आहेत ते कशाने बुजवित आहेत? ठेकेदाराला प्रत्येक वर्षी दहा टक्क्याने पैसे दिले जात आहेत. परिणामी येथील जनतेवर ठेकेदार किंवा पालकमंत्री उपकार करत नाही.जनतेच्या पैशातील ते पैसे ठेकेदाराला मिळत आहेत. त्या पैशातून सुद्धा ठेकेदार रस्त्यांचे खड्डे चांगल्या पद्धतीने भरत नाहीत ही शोकांतिका आहे.त्या विरोधात सुद्धा हे आमचे आंदोलन असल्याचे श्री उपरकर यांनी सांगितले.

यावेळी संदेश पारकर म्हणाले, सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाची पूर्णतः दुरावस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी या मार्गावर अपघात होत आहेत. गेली अनेक वर्षे अनेक नेते हा महामार्ग पूर्ण होणार अशी आश्वासने देत आहेत. जिल्हावासिय आणि शिवसेनेच्या वतीने फार मोठे आंदोलन ओसरगांव येथे टोलच्या संदर्भात तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली केले होते. त्यावेळी टोल वसुली सुरुवात करणार होते, अशावेळी जिल्ह्यातील जनता,व्यापारी, शिवसैनिक एकत्र आले, त्यामुळे टोल थांबला.एकूणच वर्षाला २४ ते २५ कोटी रुपये म्हणजेच गेल्या तीन वर्षात ७० ते ७५ कोटी रुपये आपल्या जनतेचे वाचले गेले.
यावेळी सतिश सावंत म्हणाले, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाची पायाभरणी केली,त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, शंभर वर्ष या रस्त्याला काहीही होणार नाही. पण गेल्या पंधरा वर्षातच हा रस्ता अत्यंत निकृष्ट प्रतीचा झालेला आहे.अपूर्ण काम आणि महामार्गावरील खड्ड्यांचा निषेध म्हणून आम्ही १३ ऑगस्टला आंदोलन करत आहोत. पक्षीय राजकारण करून आरो लाईनच्या बाजूला असलेले दुकाने सुद्धा हायवेच्या अधिकाऱ्यांकडून पाडली जात आहेत. त्यामुळे हे आंदोलन त्या अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात सुद्धा आहे. जिल्ह्यातील व्यापारी, जिल्ह्यातील वाहतूकदार या सर्वांना याचा त्रास होत आहे. या आंदोलनानंतर महामार्ग प्राधिकरणला जाग आली नाही तर गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा उग्र आंदोलन छेडले जाईल असे श्री.सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!