*कोकण Express*
*सिंधुरत्न समृद्धी योजना फसवी ठरणार*
*सर्वसामान्यांना योजनेचा कोणताही फायदा होणार नाही…*
*भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधू रत्न समृद्धी योजनेत सिंधुदुर्गातून ७५ कोटींचे सार्वजनिक हिताचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मात्र ही योजना फसवी आहे. यात वैयक्तिक कामांच्या प्रस्तावांचा समावेश नसल्याने ठेकेदारांचे खिसे भरले जाणार आहेत. सर्वसामान्यांना योजनेचा कोणताही फायदा होणार नसल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.
श्री.तेली यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अत्यंत कमी निधी देऊन जिल्ह्यावर राग काढण्याचा प्रयत्न केला आहे. आताही अर्थमंत्री अजित पवार यांनी सिंधुरत्न समृद्धी योजनेतून ७५ कोटींचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र हा निधी देखील अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले, फडणवीस सरकारच्या चांदा ते बांदा या योजनेतून सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी १९३ कोटींचा निधी दिला होता. त्यापैकी १०१ कोटी खर्च झाले तर ९८ कोटी ठाकरे सरकारने मागे घेतले. शेतकरी, मच्छीमार, महिला बचतगट यांना रोजगारातून आर्थिक उन्नती देणे हा चांदा ते बांदा योजनेचा गाभा होता. मात्र अर्थमंत्री पवार यांनी ती योजना बासनात गुंडाळून सिंधुरत्न समृद्धी योजना आणली. मागील सव्वा वर्षात एकही रुपया खर्च केला नाही. रत्नसिंधु समृद्धी योजना म्हणजे नवीन बाटली जुनी दारू आहे.
तेली म्हणाले, सिंधुदुर्गात पर्यटन वाढीला चालना देण्याऐवजी पर्यटन विकासाला खीळ घालण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे. मागील सव्वा वर्षात जिल्ह्याचा आराखडा वाढण्याऐवजी कमी करण्यात आला. सन २०१९ -२० मध्ये २०० कोटींचा आराखडा १४३ कोटींवर आणला. त्यातही फक्त ३३ टक्के निधी आला. हा निधी ४७ कोटी १९ लाख होता. आलेल्या ३३ टक्के निधींपैकी २५ टक्के म्हणजे ११ कोटी ७९ लाख ७५ हजार निधी कोव्हीड साठी राखीव ठेवण्यात आला. चांदा ते बांदा योजनेतील शिल्लक अखर्चित निधीही मागे घेतला. ज्या कोकणाने शिवसेनेला सत्तवर बसवले त्या त्या कोकणावर शिवसेना अन्याय करत आहे.