युद्धाच्या वेळी माध्यमांची भूमिका देखील महत्त्वाची असते- एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत

युद्धाच्या वेळी माध्यमांची भूमिका देखील महत्त्वाची असते- एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत

*कोंकण एक्सप्रेस*

*युद्धाच्या वेळी माध्यमांची भूमिका देखील महत्त्वाची असते- एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत*

*विश्व संवाद केंद्राच्या देवर्षी नारद पुरस्कारांचे थाटात वितरण*

ऑपरेशन सिंदूर ही तर एका युद्धाची झलक आहे. यातून आपण काय शिकलो आहे, हे महत्त्वाचे आहे. आधुनिक व बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने आत्मनिर्भर झाले पाहिजे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार धडाडीचे निर्णय घेत आहे. पाककडून दहशतवादी हल्ला झाला तर तो एक युद्धाचा भाग समजला जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण विजयी झाल्याचा जगात प्रचार केला पाहिजे. यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांनी केले.
मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०२५ पुरस्काराचे वितरण शनिवारी रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख वक्ते अभिजीत हरकरे, पुरस्कार समितीचे संयोजक डॉ. निशीथ भांडारकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक दत्ताजी सोलकर उपस्थित होते.
वरिष्ठ पत्रकार अरविंद कोकजे (रत्नागिरी), उल्लेखनीय कार्याबद्दल प्रिंट मीडियातील श्रीराम पुरोहित (कर्जत), इलेक्ट्रॉनिक मीडियातील विजय गांवकर (सिंधुदुर्ग) आणि सोशल मीडियासाठी संदेश फडकले यांना देण्यात आला.
हेमंत भागवत म्हणाले की, रणनितीच्या दृष्टीने चर्चा आवश्यक आहे. युद्धाकडे भावनेच्या दृष्टीने न बघता अधिक डोळसपणे बघणे गरजेचे पाकिस्तानला ज्या प्रकारे चीनने मदत केली आहे, ती गोष्ट भारताने लक्षात ठेवून त्यांना प्रत्त्युतर देणारी शस्त्रास्त्रे विकसित केली पाहिजेत आणि संरक्षणावर राष्ट्राच्या जीडीपीच्या ३ टक्के खर्च पुढील काही वर्षे केला पाहिजे.
प्रमुख वक्ते अभिजित हरकरे यांनी सांगितले की, हिंदू म्हणून जागतिक पातळीवर आपण आपले योगदान देणं गरजेचे आहे. भारत संपूर्ण जगाकडे वसुधैव कुटम्बकम् या विचाराने पाहतो आहे. भारताने किंवा हिंदूंनी कोणत्याही देशावर आक्रमण करून तिथली संस्कृती संपवली नाही. भारत नेहमीच विश्वबंधुत्वाच्या नजरेने पाहतो. म्हणूनच आपणही एक भारतीय व हिंदू म्हणून आपल्या परंपरेत असणारे मूल्ये व संस्कार जागतिक पटलावर आणणे गरजेचे आहे. यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांची काही उदाहरणे देत हिंदु संस्कृतीचा जागर करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकामध्ये डॉ. भांडारकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार सोहळा भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा व राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला मान्यता देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहितीचा वाहक नसून, राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे. सत्य आणि तथ्यावर आधारित पत्रकारिता करणाऱ्या निर्भीड पत्रकारांना प्रोत्साहन देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे देवर्षी नारद पत्रकार सन्मान आहे. यंदा या पुरस्कारांचे रौप्य महोत्सवी वर्ष असून दरवर्षी येथे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे आणि संदेश फडकले यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले. विभाग रा. स्व. संघ सहकार्यवाह डॉ. प्रफुल्ल सप्रे, राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत सहकार्यवाहिका उमाताई दांडेकर, रायगड रा. स्व. संघ विभाग कार्यवाह विजय सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा रा. स्व. संघचालक अरविंद कुडतरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. देवर्षी नारद पुरस्कार निवड समितीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर व सुकांत चक्रदेव यांनाही सन्मानित करण्यात आले. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर यांनी आभार मानले. भूषण शितूत यांनी म्हटलेल्या पसायदानाने सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!