*कोंकण एक्सप्रेस*
*तरुणांनो, देशसेवेची नशा स्वतःला लावून द्या :अतुल जाधव, पोलीस निरीक्षक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे नशा मुक्त भारत अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. यावेळी मान. अतुल जाधव, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, कणकवली यांनी सांगितले की देशाचे भविष्य हे तरुण पिढीच्या खांद्यावर असते. त्यामुळे त्यांनी दारू, गुटखा, सिगारेट, ड्रग्स सारख्या सर्व नशेपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. नशेच्या आहारी जाऊन नकळतपणे गुन्हा घडला जातो व पुढील आयुष्य बरबाद होते. त्यापेक्षा तरुणांनी देशसेवेची नशा स्वतःला लावून घ्या असे त्यांनी तरुणांना आवाहन केले.
यावेळी गेली पंधरा वर्षे नशा मुक्तीसाठी संपूर्ण जिल्ह्यात शाळा, कॉलेज व गावागावात जनजागृती करणाऱ्या नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक सौ अर्पिता राजेंद्र मुंबरकर यांचे नशा केल्याने होणारे दुष्परिणाम व उपाययोजना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाची सुरुवात कशी होते व त्यापासून दूर कसे राहायचे यावर सुंदर व माहितीपूर्ण व्याख्यान दिले. प्रशालेचे पर्यवेक्षक अच्युतराव वनवे यांनी सांगितले की नशेच्या आहारी जाऊन सामान्य नागरिकच नाही तर मोठमोठे नेते, कलाकार, खेळाडूंचे जीवनही उध्वस्त झाले आहे. त्यामुळे दररोज व्यायाम, खेळ व पोषक आहार घेऊन निरोगी व आनंदी जीवन जगा.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेचे कलाशिक्षक प्रसाद राणे, सूत्रसंचालन विलास ठाकूर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे व पवन कांबळे, पोलीस नाईक विनया सावंत व देवेंद्र जाधव, हवालदार श्री पांढरे आणि कॉन्स्टेबल स्वप्नाली कांबळे तसेच इयत्ता नववीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.