*कोंकण एक्सप्रेस*
*जुन्या पिढीतील सेवानिवृत्त कडक शिस्तीचे प्राथमिक मुख्याध्यापक,जांभवडे पंचक्रोशी शिक्षण समितीचे माजी खजिनदार शांताराम तर्फे यांचे दु:खद निधन*
कुडाळ तालुक्यातील जांभवडे बामणवाडी येथील रहिवाशी, सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक, जांभवडे पंचक्रोशी शिक्षण समितीचे माजी खजिनदार शांताराम कृष्णा तर्फे यांचे शुक्रवारी रात्री दिर्घ आजाराने आणि वृद्धापकाळाने वयाच्या ९०व्या वर्षी राहत्या घरी दु:खद निधन झाले.प्राथमिक शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना करारी बाणा, कणखर नेतृत्व,कडक शिस्त, अचूक निर्णय क्षमता, प्रामाणिकपणा, दानशूरपणा अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर अनेक यशस्वी विद्यार्थी घडवत असताना जांभवडे पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून ज्या ज्या लोकांनी माध्यमिक शाळा सुरु केली त्यांच्या बरोबर तरुणपणात कार्यरत राहून सुमारे ४०वर्षे माध्यमिक पंचक्रोशी शिक्षण समितीचे सदस्य, संचालक, खजिनदार म्हणून काम केले.आपल्या कुटुंबातील मुले शिकली पाहिजेत त्याच बरोबर इतरांची मुले शिकली पाहिजेत यासाठी शाळा उभारणीसाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी गावागावात फिरून, मुंबई सारख्या शहरात फिरून देणग्या गोळा करून शाळेच्या गरजा भागविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.कुशल नेतृत्व गुणांमुळे आणि अचूक निर्णय क्षमतेमुळे सर्वांना बरोबर घेऊन अनेक वर्षे बामणवाडीचे त्यांनी नेतृत्व
केले.आपल्या समाजातील श्री.गांगेश्वर जीर्णोद्धार मंडळाचे ते सक्रिय पदाधिकारी होते आणि आर्थिक कारभार सांभाळत होते.आपण शिक्षकी पेशात असल्याने त्यांना आपले भाऊ,मुले, पुतणे, पुतण्या, नातवंडे यांना उच्च शिक्षित करण्यासाठी मोठे योगदान आणि प्रेरणा दिली.ते शैक्षणिक, सामाजिक कार्य करत असताना सेवा निवृत्ती नंतर काही काळाने २६वर्षीपुर्वी त्यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आणि गेली २६वर्षे तीव्र इच्छा शक्तीच्या आणि प्रबळ मानसिकतेच्या जोरावर त्यांनी आजाराचा सामना केला.एवढा काळ त्यांनी आणि त्यांच्या पत्नी,मुले, कुटुंबिय यांनी त्यांच्या आजारापुढे हार मानली नाही.त्यांच्या आजारानंतर त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा त्यांची मुले, पुतणे पुढे चालवत आहेत.त्यांच्या दु:खद निधनाने समाजाची फार मोठी हानी झाली आहे.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,चार मुलगे, दोन मुली, एक भाऊ, पुतणे,सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय तर्फे यांचे वडील तर सामाजिक कार्यकर्ते श्री.अविनाश तर्फे आणि सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक महामंडळाच्या एज्युकेशनल जर्नलचे संपादक श्री वामन तर्फे यांचे काका होत.त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते.