*कोंकण एक्सप्रेस*
*बोगस बियाणे आणि खतांच्या बाबतीत फसवणूक टाळण्यासाठी शेतक-यांनीच सर्तक रहावे*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
बोगस बियाणे आणि खतांच्या बाबतीत शेतक-यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग व तालुका कृषी विभागातर्फे अधिकृत विक्री केंद्रावर वारंवार तपासण्या होतात. मात्र, तरीही काही कंपन्या थेट गावागावांमध्ये पोहोचून विविध आमिषे दाखवून अशी खते, बियाणे शेतक-यांच्या माथी मारतात. यापासून सावध राहण्यासाठी शेतक-यांनीच आता सतर्क होण्याची गरज आहे, असा सल्ला शास्त्रज्ञ आणि कृषी अधिका-यांनी दिला आहे.
वेंगुर्ला तालुका पत्रकार संघ व प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या बागायतदार, शास्त्रज्ञ मंचातर्फे आयोजित ‘शेतकरी राजा जागा हो‘ या खास चर्चासत्रात शेतक-यांची होणारी फसवणूक व त्यापासून बाळगायची सावधानता यावर विस्तृत चर्चा झाली. यावेळी जिल्हा आंबा, काजू बागायतदार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.महेंद्र गवाणकर, तालुका कृषी अधिकारी आकाश मोहिते, डॉ. सागर मोरे, डॉ.भिवराव ठवरे, डॉ.वैशाली झोटे, पंचायत सिमितीचे कृषी विस्तार अधिकारी एस.एस.सावंत, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र सहाय्यक राजू गव्हाणे, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष योगेश तांडेल, सचिव विनायक वारंग, सदस्य दाजी नाईक, प्रथमेश गुरव, भरत सातोसकर, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य महेद्र मातोंडकर, लता गुड्स ट्रान्सपोर्टचे मालक तथा आंबा बागायतदार जगन्नाथ सावंत, मठ येथील नर्सरी चालक शिवराम आरोलकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक महेंद्र मातोंडकर यांनी केले.
सरकारतर्फे वितरित होणारी रासायनिक व सेंद्रीय खते ही व्हेरिफाईडच असतात. त्यामुळे परवानाधारक विक्री केंद्रातून खरेदी करणे केव्हाही सुरक्षित असते. शेतक-यांनी केव्हाही कोणत्याही प्रकारची खरेदी करताना पक्की पावती घेणे आवश्यक आहे. याशिवाय खरेदी केलेल्या खत किवा बियाणांचे सॅम्पल वेस्टनासह हंगाम संपेपर्यंत ठेवणे गरजेचे आहे. आपली फसवणूक झाली असा संशय वाटल्यास शेतक-यांना तालुका कृषी कार्यालयामार्फत तशी तक्रार सादर करता येते, असे तालुका कृषी अधिकारी मोहिते यांनी स्पष्ट केले.
काही विक्री केंद्रातून कमी दर्जाची उत्पन्ने सुद्धा वितरित होण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभागामार्फत कॉलिटी कंट्रोल पथक तयार केलेले आहे. यामार्फत कधीही कोणत्याहीक्षणी कोणत्याही विक्री केंद्रातील कोणत्याही उत्पादनाची तपासणी करण्याचा अधिकार या पथकांना आहे. वेंगुर्ला तालुक्यात तशी कार्यवाही सुरू आहे. सुदैवाने कोणत्याही विक्री केंद्रावर संशयास्पद उत्पादन आढळून आलेले नाही, असेही तालुका कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिका-यांनी स्पष्ट केले.
अलिकडच्या काळात तंत्रज्ञान अतिशय विकसित झाले असल्याने हवामान विभागाकडून पावसाचे अचूक अंदाज अगोदरच मिळत असतात. हे अंदाज लक्षात घेऊन शेतक-यांनी आपल्या शेतीत बदल केले तर त्याचा अधिक फायदा होतो. शेतक-यांनी कोणत्याही पकारच्या समस्या जाणवल्यास पादेशिक फळ संशोधन केंद्राशी जरूर संफ साधावा, असे डॉ. महेंद्र गवाणकर म्हणाले.
आपली फसवणूक करण्यासाठी अनेक आमिषे आ वासून उभी आहेत. या आमिषांना बळी न पडता अधिकृत व परवानाधारक संसाधणे खरेदी करणे कधीही हिताचे ठरेल. शेतक-यांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन जयप्रकाश चमणकर यांनी केले.
प्रास्ताविक महेंद्र मातोंडकर यांनी तर आभार विनायक वारंग यांनी मानले.