*कोकण Express*
*खुंटेला बांधलेल दाव सुटता सुटत नाही*
*समाज साहित्य संघटनेच ‘बहिणाबाईंच्या लेकी’ कवयित्री संमेलन रंगतदार*
*ज्येष्ठ कवयित्री अनुपमा उजगरे यांचे मार्गदर्शन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
‘मला खूप काही बोलायचं असतं पण खुंटेला बांधलेलं दाव सुटता सुटत नाही’… कविता निर्मितीच्या गुंतागुंतीची अशी प्रक्रिया उलगडून दाखविणारी कविता ज्येष्ठ कवयित्री अनुपमा उजगरे यांनी कवितेतून सादर केली आणि ऐकणारा रसिक वर्गही उस्फूर्त दाद देऊन गेला. निमित्त होते ते समाज साहित्य संघटना सिंधुदुर्ग आणि नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘बहिणाबाईच्या लेकी’ कवयित्री संमेलनाचे! उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आयोजित केलेल्या या संमेलनात बोलताना उजगरे यांनी चांगली कविता वाचूनच चांगली कविता लिहिण्याचे भान येते असे आग्रहाने सांगितले.
जिल्ह्यातील कवयित्रींची चांगली कविता महाराष्ट्रातल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘बहिणाबाईच्या लेकी’ या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी नामवंत कवी अजय कांडर, समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, सचिव सरिता पवार आदी उपस्थित होते.
श्री मोतोंडकर यांनी संध्या तांबे यांची कविता सादर करून उदघाटन केलेल्या आणि सरिता पवार यांनी अर्थवाही सूत्रसंचालन केलेल्या ह्या कविसंमेलनात स्त्री जाणिवेच्या सशक्त कविता सहभागी कवयित्रींना सादर केल्या. कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कवयित्री संमेलनात कविता सादर केलेल्या कवयित्रींमध्ये संध्या तांबे, कल्पना बांदेकर,श्वेतल परब,शालिनी मोहळ,मनीषा पाटील,नीलम यादव,प्रमिता तांबे, मेघना सावंत आदींचा समावेश होता.
उजगरे म्हणाल्या केशवसुत,मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे यांची कविता मराठीत जोपर्यंत शाश्वत आहे तोपर्यंत आपण सगळे कवी त्यांच्यासमोर नवीनच आहोत.ही भावना आपल्यात असायला हवी. संवेदनशील मनाला नाद सूर शब्दांचे भान उपजत असतं. मी लहानपणापासून कविता लिहीत होते. पण मी जसजशी चांगली कविता वाचत गेले त्यातून मला माझ्या कवितेचा दर्जा कळला. आपण इतरांची चांगली कविता वाचत जातो तेव्हाच चांगली कविता लिहिण्याचं भान येत जातं. आपलेच अनुभव आपण कवितेत शब्दबद्ध केले पाहिजेत.
श्री कांडर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहित्याची चांगली परंपरा आहे. यात काव्य परंपरा सशक्त आहे. केशवसुत ते आजच्या शरयू आसोलकर, संध्या तांबे, उत्तम पवार, सिद्धार्थ विष्णू तांबे अशी ही परंपरा अधिक सशक्त होत गेलेली इथे आढळते. अलीकडल्या काही काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कवयित्रींची कविता मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाच्या दिशेने जाताना दिसत असून जिल्ह्यात अनेक कवयित्री उत्तम कविता लिहीत आहेत. त्यांची ही कविता महाराष्ट्रातल्या चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी या ‘बहिणाबाईच्या लेकी’ कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात निमंत्रित केलेल्या सर्व कवयित्री अतिशय गंभीरपणे काव्यलेखन करत असून त्यांच्या कवितेचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.आणि ह्याची प्रचिती या कविसंमेलनात सादर झालेल्या कविता ऐकून आपल्याला येईल.
श्री मातोंडकर म्हणाले समाज साहित्य संघटना आणि नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी सातत्याने कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. समाज साहित्य संघटना कवितेचे विविध कार्यक्रम राबवताना जिल्ह्यातील कवींना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्याचाच हा एक भाग म्हणजे हे ‘बहिणाबाईच्या लेकी’ संमेलन होय.
शेवटी मनीषा पाटील यांनी आभार मानले.