जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट*

*वैभव नाईक,परशुराम उपरकर,राजन तेली,सतीश सावंत,सुशांत नाईक यांनी केल्या विविध मागण्या*

*जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद*

मे महिन्यातच मुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरू झाल्याने आंबा, कोकम, जांभूळ, फणस, भुईमूग, चवळी या पिकांचे नुकसान झाले असून त्याची नुकसान भरपाई मिळावी, त्याचबरोबर जुलै २०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी, शेतीचा हंगाम सुरु झाल्यामुळे लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करून कृषी अवजारांचे वाटप करण्यात यावे. आंबा काजू फळपिकांचे नुकसान झाले असून ३० जून २०२५ पूर्वी फळ पिक विम्याचे टिगर जाहीर करण्याचे आदेश कृषी विभाग व विमा कंपनीला देण्यात यावेत.जिल्ह्यात युरिया खताचा पुरवठा करावा आचरा राज्यमार्ग व दहिबाव नारिंग्रे मार्गावरील ब्रिजची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेतली.
यावेळी संबंधित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी कृषी विभाग, विमा कंपनीचे अधिकारी यांच्याशी यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच ८ दिवसात कृषी अधिकाऱ्यांनी फळपीक नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,अमरसेन सावंत, बबन बोभाटे,राजू कविटकर, श्री. सावंत आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, आंबा, कोकम, जांभूळ, फणस हि फळपिके मे महिन्याच्या अखेर पर्यंत परिपक्व होतअसतात मात्र गेले १५ दिवस ऐन मे महिन्यातचमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडल्याने आंबा, कोकम, जांभूळ, फणस हि फळपिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी सदर फळपिकांच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अतिवृष्टीमुळे काही घरांची देखील पडझड झाली आहे, शेतीचे बांध बंदिस्त वाहून गेले आहेत त्याची देखील नुकसान भरपाई देण्यात यावी. आचरा राज्यमार्ग व दहिबाव नारिंग्रे मार्गावरील ब्रिजची कामे ठेकेदाराने पूर्ण न केल्याने आणि पर्यायी रस्ते नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने हे दोन्ही मार्ग बंद आहेत. त्यामुळे सदर ब्रिजच्याकामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच सदरमार्गावरील वाहतूक इतर मार्गावरून वळविण्यात आल्याने वाढीव अंतरामुळे नागरिकांना एसटीसाठी ज्यादा भाडे आकारले जात आहे. ठेकेदाराच्या आणि त्यावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा नागरिकांना विनाकारण भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे सदर मार्गावरील एसटीभाडेवाढ रद्द करण्याचे आदेश एसटी महामंडळाला देण्यात यावेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी गावागावातील रस्त्यांची कामे अपूर्ण ठेवल्याने अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य झाले आहे.त्यावर उपाययोजना करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.
जुलै २०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे अनेक घरे, मांगर कोसळले असून नागरिक व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र याला वर्ष होत आले तरी त्या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही. एकट्या ओरोस ख्रिश्चनवाडी येथील ९८ घरांच्या नुकसानीची एकूण३ कोटी ४१ लाख रु नुकसान भरपाई शासनाकडून प्रलंबित आहे. तरी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून हि नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यात यावी. कृषीयांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे, ठिबक सिंचनाचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जात आहे. मात्र त्यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डची अट ठेवण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी फार्मर आयडी कार्ड काढूनही अद्याप त्यांना फार्मर आयडीकार्ड मिळालेले नाही. आता शेतीचा हंगाम सुरु झाल्यामुळे लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करून कृषी अवजारांचे वाटप करण्यात यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कृषी अवजारांसाठी अर्ज केले आहेत त्यासर्वांना कृषी अवजारे मिळण्यासाठी कृषीयांत्रिकीकरण योजनेची व्याप्ती वाढवावी. त्याचबरोबर हवामानातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे यावर्षी देखील आंबा काजू फळपिकांचे नुकसान झाले असून ३० जून २०२५ पूर्वी फळ पिक विम्याचे टिगर जाहीर करण्याचे आदेश कृषी विभाग व विमा कंपनीला देण्यात यावेत. शेतकऱ्यांना भात शेतीसाठी आवश्यक असलेले युरिया खत देखील जिल्ह्यात लवकरात लवकर उपलब्ध करण्यात यावे, हत्ती पकड मोहीम राबवावी. हवामान केंद्रे दुरुस्त करावी अशा मागण्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!