*कोंकण एक्सप्रेस*
*पर्यावरण, शेतकरी यांना शक्तीहिन करणारा शक्तीपीठ महामार्ग नकोच -भाई चव्हाण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाविकांना राज्यातील मोठ्या मंदिरांकडे जाण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग केला जात असल्याचे सरकार सांगत आहे. मात्र आजच्या घडीला अशा मंदिराकडे जाण्यासाठी दोन पेक्षा अधिक पर्यायी महामार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यावरण, शेतकरी यांना शक्तीहिन करणार्या शक्तीपीठ महामार्गाला सर्वंच स्तरांतून विरोध होत आहे . त्यामुळे हा महामार्ग नकोच, अशी रोखठोक भुमिका आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी जाहीर केली आहे.
राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या आझाद हिंद शेतकरी संघटनेची आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दृकश्राव्य सभा झाली. त्यावेळी चव्हाण यांनी ही भुमिका मांडली आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सतीश रोटे-पाटील, चंद्रकांत झोरे, डॉ . अमित दुखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित गोव्यापर्यत जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प आजच्या घडीला ८६ हजार कोटी रुपये खर्चाचा आहे. तो खाजगी कंत्राटदारांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. त्यानंतर वर्षांहूनही अधिक वर्षें टोल वसुली केली जाणार आहे. त्यामुळे तो कोणाच्या फायद्यासाठी बांधला जाणार आहे हे स्पष्ट होत आहे, अशी टिप्पणी करुन चव्हाण यांनी मानवाच्या अति हावेपोटी ग्लोबल वार्मिंग वाढून जागतिक पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. पर्यायी महामार्ग उपलब्ध असताना या महामार्गाचा अट्टाहास म्हणजे मानवी जीवनाचा, पर्यायाने निसर्गाचा मोठ्या र्हास होणार आहे. यंदाच्या वर्षी जागतिक स्तरावर अवकाळी पावसाने जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजविला आहे. त्यामुळे हा महामार्ग म्हणजे पर्यावरण, शेतकरीवर्ग आदींना शक्तीहिन करणारा ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून शेतकर्यांसह, सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमींनी एकजूटीने संघर्ष करून विरोध केला पाहिजे.
यावेळी ॲड. रोटे-पाटील, झोरे, दुखंडे आदींनी उपरोक्त भूमिका मांडली.