*कोंकण एक्सप्रेस*
*विकसित कृषी संकल्प अभियानाचे सिंधुदुर्ग मध्ये आयोजन*
*विकसित कृषी संकल्प अभियानाला 29 मे पासून सुरुवात*
*किर्लोस कृषी विज्ञान केंद्रामार्फत सिंधुदुर्ग मध्ये अंमलबजावणी*
*सिंधुदुर्गच्या 90 गावांमध्ये पोहोचणार विकसित कृषी संकल्प अभियान*
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय द्वारे देशपातळीवर व्यापक स्तरावर विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग मध्ये किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग मध्ये शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वतंत्र दोन टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीम दर दिवशी तीन गावांमध्ये जाणार असून दोन्ही टीम द्वारे दर दिवशी सहा गावात जाणार असून पंधरा दिवसात 90 गावात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश खरीप हंगामातील पिकांसंदर्भातील विविध तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणे, विविध शासकीय योजना व कृषी धोरणांची माहिती देणे तसेच शेतकऱ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञान ज्ञानाबाबत जागृती निर्माण करणे हा आहे. या अभियानाद्वारे मृदा आरोग्य पत्रिका, संतुलित व सेंद्रिय खतांचा वापर, नैसर्गिक शेती, पीक व बियाणे निवड व हवामान आधारित कृषी सल्ला आदी विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषतः शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने विविध संशोधन शिफारशी शेतकऱ्यांनी स्वीकार करून त्याचे अंमलबजावणी करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून विकसित आणि समृद्ध शेतीकडे वाटचाल साधता येईल.
बाळकृष्ण गावडे
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
कृषी विज्ञान केंद्र