*कोंकण एक्सप्रेस*
*श्री. कुलदेव विद्यमंदिर पेंढऱ्याचीवाडी शाळेच्या सर्व सातवी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला तालुक्यातील श्री. कुलदेव विद्यमंदिर पेंढऱ्याचीवाडी शाळा पेंडूरच्या सर्व सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा पहिला-वाहिला वार्षिक स्नेहमेळावा रविवारी ४ मे रोजी वेंगुर्ला तालुक्यातील *श्री.कुलदेव विद्यामंदिर पेंडूर* येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या अविस्मरणीय दिवसांच्या जुन्या गोड-कडू आठवणींना उजाळा मिळाला.
मुंबईत राहून आपल्या शाळेविषयी ओढ असलेल्या आप्पा गावडे याने जी संकल्पना काही माजी विद्यार्थ्यांसमोर मांडली. तद्नंतर इयत्ता सातवीतून पुढे गेलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी काही तरी करावे, या उद्देशाने एकत्र येण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. आणि सातवीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेतच भेटण्याचे ठरविले. त्यानुसार कार्यरत शिक्षकांशी आप्पा गावडे यांनी संवाद साधला. आणि ४ मे रोजी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेत स्नेहमेळावा संपन्न झाला. यापैकी काही विद्यार्थी कोरोना काळात या शाळेत क्वारंटाईन होते. त्यावेळी आपल्या शाळेसाठी आपण काही करावे, असे त्यांनी ठरवले.
सातवी बॅचचे हे बालपणीचे मित्र-मैत्रिणी तब्बल काही वर्षांनंतर पहिल्यांदा एकत्र आले होते. जशी शाळा सहलीची आठवण व्हावी त्याप्रमाणे आपणही दरवर्षी स्नेहमेळावा करावा, असे ठरविण्यात आल्याप्रमाणे रविवारी (४ मे रोजी) सातवी बॅचचे माजी विद्यार्थी पुन्हा पहिल्यांदा एकत्र आले.
शाळा म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, तर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची दिशा असते. याच शाळेतील बालमित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आल्याने आनंदाला पारावार नव्हता. या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर सगळे मित्र-मैत्रिणी रमले होते. पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून आपल्या शालेय मित्रांच्या भेटीच्या ओढीने एकत्र आलेल्या या सर्व बालपणीच्या मित्र मैत्रिणींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. काही जण तर पहिल्यांदाच भेटत असल्याने त्यांच्यातील उत्साह आणि उत्सुकता विशेषत्वाने जाणवत होती.
या स्नेहमेळाव्याला अध्यक्ष मा.श्री.बाबुराव गवंडे सर, पेंडूर गावचे सरपंच मा.श्री संतोष गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री.मिलिंद गावडे, सर्व आजी-माजी शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. फटनाईक मॅडम, उपाध्यक्ष श्री.नंदकिशोर चव्हाण उपस्थित होते. शाब्दिक स्वागत करून राष्ट्रगीत, प्रार्थना व नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सर्व मान्यवर तसेच आजी-माजी शिक्षकवृंद यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचीत सन्मान करण्यात आला. *शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक सौ.आजगावकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेची सध्याची परिस्थिती व प्राथमिक गरजा याबद्दल माहिती दिली.* सर्व माजी शिक्षकवृंद व माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला.
स्नेहमेळाव्यासाठी प्रमुख अतिथी तसेच माजी विद्यार्थी म्हणून उपस्थित राहून गावचे सरपंच श्री. संतोष गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष व माजी जेष्ठ शिक्षक श्री. बाबुराव गवंडे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी केतन गावडे याने केले. निवेदन माजी विद्यार्थीनी सौ. स्मिता गावाडे हिने केले.
ज्याने ही संकल्पना मांडली त्या आप्पा गावडे ने तर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत तुफान फटकेबाजी केली. आप्पा याने सर्वांना विनंती केली की, आपल्या शाळेसाठी एक मदतीचा हात देऊन आपल्या शाळेच्या विकासासाठी हातभार लावा. तसेच शाळेची कमी होणारी पटसंख्या, वाढत चाललेल्या गरज ह्या सर्व बाबींचा उलगडा आप्पा ने आपल्या मनोगता मध्ये केला.
यावेळी आजी-माजी शिक्षक बाबुराव गवंडे, सुरेश राऊळ उभयता, सिद्धे गुरूजी , मिलन सांगेलकर, काजल जोशी, सीताराम लांबर, चिले गुरूजी, बालकृष्ण गोसावी, अस्मिता पेडणेकर, तसेच विद्यमान शिक्षक काळोजी सर, तेंडोलकर सर, बिर्जे सर, शेळके सर, मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर आणि निवृत्त मुख्याध्यापक भाऊ आजगावकर हे सारे गुरुवर्य उपस्थित होते.
या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला लेझीम, वाद्य संच, फॅन, निवेदन स्टँड अशा भेटवस्तू दिल्या. माजी विद्यार्थीनी ज्योती गावडे हिने स्वतः मुंबईहून आणलेल्या पुरणपोळ्यांवर सर्वांनी ताव मारला.
‘पुन्हा भेटूया’ असे सांगून जड पावलांनी सर्वांनी एकमेकांचा निरोप
घेतला.