*कोंकण एक्सप्रेस*
*गोवर्धन गोशाळा म्हणजे जैविक शेती, धार्मिक आस्था, पर्यावरण पूरक प्रकल्प – उपमुख्यमंत्री शिंदे*
*बाळासाहेबांच्या ढाण्या वाघाला बघून जंगलातील वाघ पळून गेला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गोवर्धन गोशाळा हा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प आहे. हातात घेतलेले काम पूर्ण करणे ही नारायण राणेंची खासियत आहे. त्यामुळेच हा गोवर्धन प्रकल्प आहे. यामुळे कोकणात धवल क्रांती होईल.समृद्धीचे नवीन दालन सुरू झाले आहे. धाडसाने निर्णय घेऊन ते पूर्ण करणे हे राणेंनी दाखवले. गोवर्धन गोशाळेसाठी जमीन घेण्यासाठी करंजेत आल्यावर झाडावर वाघ बसलेला होता , आम्हाला बघून तो झाडावरून उतरून जंगलात गेल्याचा उल्लेख खासदार राणेंनी केला होता. त्याचा उल्लेख करत बाळासाहेबांच्या ढाण्या वाघाला बघून जंगलातील वाघ पळून गेल्यास आश्चर्य नाही असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.कोकणात आल्यावर देवभूमीत आल्यासारखे वाटते. कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश आहे.या देवभूमीत पर्यावरण स्नेही असा गोवर्धन गोशाळेचा प्रकल्प राणेंनी उभारला आहे. यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल. गाय ही केवळ पवित्र नसून ती उपयुक्त सुद्धा आहे. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी येईल. गोशाळेच्या प्रकल्पातून जैविक शेती, धार्मिक आस्था आणि पर्यावरण पूरक संकल्पना राणेंनी प्रत्यक्षात आणली. गोवर्धन गोशाळेमुळे कोकणात धवलक्रांती येईल असेही शिंदे म्हणाले.