*कोंकण एक्सप्रेस*
*करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
करंजे येथील गोवर्धन गोशाळा ही खरी संकल्पना माझ्या कु. अभिराज, कु. निमिश या दोन्ही नातवांच्या प्रेरणेतुन मिळाली आहे. गोमातेबद्दलच्या त्यांच्या प्रेमामुळे त्यांना गायींना दररोज चारा घालून शाळेला जाण्याची आवड लागली होती. त्यामुळे ही गोशाळा उभारली आहे. या गोशाळेचा एकूण परिसर ७० एकरचा असून त्यामध्ये २३ एकरमध्ये ही गोशाळा उभारण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्र चाऱ्यासाठी तसेच बकरी पालन यासाठी ठेवले आहे. केवळ गायीची सेवा आणि आवडी सोबतच कोकणातील तरुण तरुणींना गाय म्हणजे काय? गायीला माता का मानतात ? याबाबत नव्या पिढीला या गोशाळेतून माहिती मिळेल. हिंदु संस्कृतीत गाय म्हणजे समृद्धी आहे. करंजे येथील गोशाळेचे ११ मे रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही निमंत्रण दिले आहे .
गायीचे संवर्धन करण्यासाठीच गोवर्धन गोशाळा काम करेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.
करंजे येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी संदीप कुडतरकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार नारायण राणे म्हणाले, गोवर्धन गोशाळा सुरु करण्यापूर्वी राजस्थान, गुजरात मधील गोशाळा पाहून आलो.
गायींच्या विविध जातींबद्दल माहिती गोळा केली. त्यानंतर करंजे येथे जंगलमय भाग होता, याठिकाणी पाण्याची व्यवस्था होती म्हणून या ठिकाणी गोशाळा करण्याचा निर्णय घेतला.
याठिकाणी अनेक वेगवेगळ्या जातीच्या गायी आहेत, गावठी गायी आहेत. गीर गाय आहे, त्यांच्या तुपाचा दर १९ हजार ५०० रुपये किलो आहे. त्यामुळे कोकणातील तरुणांनी उद्योग करावेत. समृद्र किनाऱ्यावरील लोकांनी मुबलक पाणी असल्याने गायी पाळाव्यात, यासाठी मार्गदर्शन केले जाईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, तरुणांनी दुधाच्या व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी भव्य दिव्य ही गोशाळा मार्गदर्शन करणार आहे. शासनाच्या माध्यमातून शेतक-यांसाठी ५० टक्के अनुदान असलेली योजना पुढे नेणार आहे. दुग्ध व्यवसायासाठी शेतक-यांना मार्गदर्शन केले जाईल, त्यातुन त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.
ते म्हणाले, या गोशाळेत श्रीकृष्णाचा संपूर्ण जीवनप्रवास प्रतिमा स्वरुपात उपलब्ध करण्यात आला आहे. त्यापासून नागरिकांना प्रेरणा मिळेल. गायींच्या शेणापासून खत कारखाना याठिकाणी होणार आहे. जिल्ह्यातील शेतक-यांकडून शेण विकत घेतले जाईल. त्यापासून खत आणि बायोगॅस बनवला जाणार आहे. तसेच गायींच्या गोमुत्रावर देखील प्रक्रिया होईल. तसेच त्यातून औषधे तयार केली जातील. गोपालन करणाऱ्या जिल्ह्यातील शेतक-यांकडून दूध खरेदी केले जाईल, त्यापासून चिज, दही बटर, पनीर, तूप यासारखे दुग्धजन्य पदार्थ बनवले जातील. त्यातून शेतक-यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणावी असा आमचा प्रयत्न आहे. तसेच गायीला आम्ही प्रवित्र मानतो, तीची सेवा व्हावी या हेतूने हा प्रयत्न आहे. जिल्ह्यात जी भाकड जनावरे आहेत, त्यांना याठिकाणी आम्ही ठेवण्याची व पालनपोषण करण्याची व्यवस्था करणार आहोत. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी ठेवण्यात आले आहेत. जर एखादी गाय जखमी असेल, तर त्या जखमी गाईला गोशाळेत आणण्यासाठी रुग्णवाहिका ठेवण्यात येईल, असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.
या गोशाळा परिसरात काही महागडी झाडे आणून लावली आहेत. त्यांचे संवरधन करण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये पिंपळ झाड व अन्य वृक्ष लागवड येथील लोकांना पाहण्यासाठी केली आहे. मला आता जिल्ह्यात एक चांगली नर्सरी बनवायची आहे, असेही खा. नारायण राणे यांनी यावेळी सांगितले. तसेच नागरिकांनीही गोपालन व वृक्ष संवरधन करावे असे आवाहन त्यांनी केले.