आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन*

*८ मे रोजी शिवापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन*

*दीडशे माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा केला जाणार सत्कार*

*जिल्हाधिकारी अनिल पाटील,प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले राहणार प्रमुख उपस्थित*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील भारतीय सेनेतील दहा शहीद सुपुत्रांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवापूर येथे “रणस्तंभ” उभारण्यात आला आहे. या रणस्तंभाचे उद्घाटन ८ मे रोजी सकाळी १० वाजता कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या या वीर पुत्रांना सलामी देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील,प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तर माजी सैनिक प्रतिनिधी बाबुराव कविटकर,शिवराम जोशी, विष्णू ताम्हणकर, शशिकांत गावडे, माजी सभापती मोहन सावंत, सरपंच सुनीता शेडगे, उपसरपंच महेंद्र राऊळ आधी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिवापूर गावातील भारत स्वतंत्र्याच्या लढाईपासून आजपर्यंत शहीद झालेल्या दहा भारतीय सैनिकांनी स्वतःच्या प्राणाची अवती दिली देशासाठी वीरमरण पत्करले.यामध्ये न्हानू बाबाजी घाडी हे आझाद हिंद सेनेतून शत्रूशी लढताना शहीद झाले. १९४५ च्या दुसऱ्या महायुद्धात लक्ष्मण तात्या पेडणेकर, तर १९६२ च्या चीन युद्धात सिताराम भिसाजी रेंमुळकर, यांना वीरगती प्राप्त झाली. १९७२ साली लक्ष्मण नाना पालकर तर १९७३ साली शिवराम लक्ष्मण राऊळ यांना वीरगती प्राप्त झाली. १९७५ साली अंबाला टॅंक येथे दत्ताराम धाकू पेडणेकर तर १९७९ साली लखनऊ येथे सुभाष दाजी शिंदे यांना वीरगती प्राप्त झाली. १९९३ साली ऑपरेशन ऱ्हिनो नागालँड येथे सेनापदक प्राप्त लक्ष्मण सिताराम शेडगे यांना वीरगती प्राप्त झाली. १९९९ साली सुभाष लक्ष्मण पालकर यांना वीरगती प्राप्त झाली तर २०१७ मध्ये जम्मू काश्मीर येथे हरी गोपाळ पाटकर यांना वीरगती प्राप्त झाली होती. या सर्व शिवापूरच्या वीर पुत्रांचा सन्मान म्हणून रणस्तंभ उभारण्यात आलेला आहे. या रणस्तंभा ला पुष्पचक्र अर्पण करून वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या नातेवाईकांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहेत.
यावेळी शिवापूर गावातील व पंचक्रोशीतील दीडशे माजी सैनिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. तर शिवापूर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन यावेळी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!