*कोंकण एक्सप्रेस*
*आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये तरुणांचे योगदान आवश्यक- प्रा. डॉ. एम. एस. देशमुख*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड येथे भव्य आणि शिस्तबद्ध वातावरणात दीक्षांत समारंभ पार पडला. विविध शाखांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख आणि मानवविद्या शाखेचे अधिष्ठाते माननीय श्री. एम. एस. देशमुख सर होते. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात भारतातील शिक्षणाचा इतिहास, शिक्षणाचा मूळ उद्देश, आणि भारताला महासत्ता बनवण्यासाठी शिक्षणाचे योगदान याविषयी सखोल विवेचन केले. याशिवाय, भारताचा GDP इंडेक्स, Innovation Index, आणि Human Development Index मध्ये सध्याचे स्थान याची माहिती देत, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन बाबींचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.
देशमुख सरांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) याविषयी सविस्तर भाष्य करताना, हे धोरण कसे उपयुक्त ठरणार आहे, आणि भविष्यातील विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारचे कौशल्य आत्मसात करावे यावर भर दिला. त्यांनी आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत शिरसाटे, डॉ. लक्ष्मण सुरवसे, तसेच ज्युनिअर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शरद शेटे सर उपस्थित होते.प्रा. शिरसाटे यांनी विद्यार्थ्यांना करिअर विकासासाठी प्रेरित केले तसेच जीवनातील योग्य दिशा निवडण्याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले, तर डॉ. शरद शेटे यांनी UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व पटवून देत मोठे ध्येय बाळगण्याची प्रेरणा दिली.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, आत्मविश्वास, नीतिमत्ता आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनेत्रा ढेरे यांनी केले. मुख्य समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. पी. एन. कांबळे यांनी प्रभावीपणे केले, तर आभारप्रदर्शन प्रा. बाळकृष्ण दत्तू तेऊरवाडकर यांनी केले. दीक्षांत प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष भूमिका प्रा. प्रशांत राऊत यांनी निभावली व प्रमाणपत्र वितरण सुसंघटितपणे पार पाडले. यावेळी विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना दीक्षांत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमानाचे भाव दाटले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व समित्यांनी उत्कृष्ट समन्वय साधून मेहनत घेतली. दीक्षांत समारंभाच्या माध्यमातून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने नवे प्रेरणास्त्रोत दिले.