*कोंकण एक्सप्रेस*
*कोकण रेल्वे विविध प्रश्नांबाबत खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष*
*कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये दाखल होण्याची प्रक्रीया सुरु
वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत खा. नारायण राणे यांचा आग्रह*
*नवी दिल्ली*
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण्याच्या प्रक्रीयेला गती देण्यात आली असतानाच प्रस्तावीत वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वेमार्गासाठी विशेष निर्णय घेण्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दर्शविली. माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांनी नवी दिल्लीत रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वेच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली.
कोकण रेल्वेचे व्यवस्थापन सध्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे केले जाते. हे एक स्वायत्त महामंडळ असून लवकरच हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे स्थानकादरम्यानच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी अशी मागणीही खा. नारायण राणे यांनी या भेटी दरम्यान केली.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटी दरम्यान खा.नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्याचे लक्ष वेधताना २०१६ रोजी घोषणा झालेला प्रस्तावीत वैभववाडी- कोल्हापुर (आचिर्णे जंक्शन) रेल्वे लाईन निर्मीतीला चालना देण्याची मागणी केली. निवेदनात खा.राणे म्हणतात,वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे लाईन बांधण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६ मध्ये केली होती. तेव्हापासून मी या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक तरतूद केली, परंतु रेल्वे बोर्डाने त्यास मान्यता दिलेली नाही यामुळे हा प्रकल्प मागे पडत आहे.
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची लांबी १०७ किमी आहे. कोल्हापूर-वैभववाडी सेक्शनचे बांधकाम केवळ कोकण रेल्वेसाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या क्षेत्रासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरेल. हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडेल, किनारपट्टीच्या प्रदेशात बंदरे आणि बंदरांचा विकास करेल आणि सीमावर्ती भागातून किनाऱ्यापर्यंत मालाची वाहतूक सोपी होईल.राज्य विकासाची नवी भरारी घेईल.म्हणून आपणास विनंती आहे की आपण या प्रकरणी वैयक्तिकरित्या लक्ष घालून वैभववाडी कोल्हापूर रेल्वे लाईनचे बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची सूचना संबंधितांना करावी.अशी मागणी खा.नारायण राणे यांनी केली आहे.