*शिवसेनेची टीम श्रीनगर मध्ये दाखल*

*शिवसेनेची टीम श्रीनगर मध्ये दाखल*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेनेची टीम श्रीनगर मध्ये दाखल*

*राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू*

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग*

श्रीनगर :- जम्मू आणि काश्मीरमधील पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना सुखरूप राज्यात परत आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले असतानाच आता तिथे अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप राज्यात आणण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मदत पथक काल रात्रीच मुंबईहून श्रीनगरसाठी रवाना झाले आहे. या पथकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, डोंबिवलीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना विमानात बसवून रवाना केल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या बाकीच्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाणे आणि डोंबिवली येथून काश्मीर सहलीसाठी गेलेल्या 40 आणि 55 जणांच्या ग्रुपशी या मदत पथकाने संपर्क केला असून त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच त्यांच्यासह तिथे अडकलेल्या राज्यातील इतर पर्यटकांच्या देखील ते संपर्कात असून त्यांना देखील सुखरूप राज्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मदत कार्यावर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीत राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. मात्र सध्या श्रीनगर मधील परिस्थिती नाजूक असून पर्यटकांना परत आणण्यासाठी यंत्रणांशी संपर्क साधून समन्वय साधावा लागत आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे शर्थीचे प्रयत्न शिवसेनेच्या मदत पथकाच्या वतीने करण्यात येत असून लवकरच केंद्र शासनाच्या मदतीने या पर्यटकांना सुखरूपपणे राज्यात आणले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

संपर्क क्रमांक:- 022-22027990

मुंबई, दि. 23 : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.

काश्मीरमधील संपर्क क्रमांक:

श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
१) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543

२) व्हॉट्सॲप : 7006058623, 7780805144, 7780938397

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!