*भेरा : दिग्दर्शक व कलावंतांशी बहारदार संवाद आणि सन्मान*

*भेरा : दिग्दर्शक व कलावंतांशी बहारदार संवाद आणि सन्मान*

*कोंकण एक्सप्रेस*

*भेरा : दिग्दर्शक व कलावंतांशी बहारदार संवाद आणि सन्मान*

*वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली, सखी परिवार, कणकवली आणि मिळून साऱ्याजणी मासिक, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन*

*कणकवली : प्रतिनिधि*

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली, सखी परिवार, कणकवली आणि मिळून साऱ्याजणी मासिक, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने देश विदेशात अनेक पारितोषिके पटकावलेल्या भेरा चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलावंत यांच्याशी संवादाचा आणि त्यांच्या सन्मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संकुलात भेरा चित्रपटाचे दिग्दर्शक, सह-पट कथालेखक श्रीकांत प्रभाकर, चित्रपटात अनिकाकी भूमिका रंगवणारी श्रद्धा खानोलकर, नायक विष्णूच्या भूमिकेतील दीपक जोईल, प्रमोद कोयंडे ( दादा सरपंच), श्री विजय गांवकर (पुजारी ) आणि डॉ. विठ्ठल गाड ( गावकरी) यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांशी मोकळेपणाने संवाद साधला.
संवादक श्री प्रसाद घाणेकर यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने उत्तरे देत श्रीकांत प्रभाकर यांनी भेराचे कथाबीज सुचण्याची, कथालेखक प्रसाद खानोलकर यांचे त्यातील महत्त्वाचे योगदान, चित्रपटासाठीची, ऑडिशन प्रक्रिया, कोकणाच्या निसर्ग आणि पावसाची चित्रपटातील महत्त्वाची भूमिका, चित्रीकरण करताना आलेल्या अडचणी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्यावर मात करत पूर्णत्वास नेलेला चित्रपट याबद्दल सविस्तर सांगितले.
श्रद्धा खानोलकर यांच्याकडे अपघाताने, म्हणजे त्या भूमिकेसाठी दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांच्या अपेक्षा पूर्ण करणारी कुणीच स्त्री कलावंत न सापडल्याने भेरातील अनिकाकी ही प्रमुख भूमिका आली. कधीतरी लहानपणी मराठी शाळेत असताना छोट्याशा नाटकात केलेल्या कामाचा नगण्य अनुभव असताना श्रद्धा यांनी श्रीकांत यांनी “जे जे सांगितलं ते मी मनापासून आणि ‘झेपेल आपल्याला’ या स्त्रीच्या अंगभूत आत्मविश्वासाने केलं आणि आता ती भूमिका सगळ्यांना आवडली” असं सहजपणे सांगितलं. श्रद्धा यांचा हा नैसर्गिक साधेपणा आणि मोकळेपणा प्रेक्षकांना खूप भावला.
ऑडिशन द्यायच्या काही काळच आधी ही भूमिका कर्णबधिर असलेल्या मुक्या मुलाची आहे हे कळल्यावर उडालेली धांदल, रंगभूमीवर गेली काही वर्षें सातत्याने केलेल्या कामामुळे या भूमिकेचे वाटलेले आव्हान आणि स्वतःला दिग्दर्शकाच्या हाती पूर्णपणे सोपवून केलेले जीवतोड श्रम याबद्दल दीपक जोईल आपले अनुभव सांगितले.
दादा सरपंच हा अलीकडच्या काळातील सत्ताधीश न वाटता तो एकाचवेळी संवेदनशील माणूस आणि तरीही गावाच्या रक्षणाची त्याच्यावर कोविड काळात सरकारने टाकलेली जबाबदारी निभावताना होणारे मानसिक द्वंद्व ही या भूमिकेची निकड आहे हे दिग्दर्शकाकडून समजून घेऊन आपण ही भूमिका करत गेलो असे मनोगत श्री प्रमोद कोयंडे यांनी व्यक्त केले.
यापूर्वी लहानमोठ्या भूमिका केल्या असल्या तरी या चित्रपटाने डबिंगचा पहिला अनुभव दिला. वरवर सोपी वाटणारी ही तांत्रिक गोष्ट प्रत्यक्षात किती दमछाक करणारी असते याचा अनुभव प्रमोद कोयंडे यांनी सोदाहरण स्पष्ट केला.
याच चित्रपटात पुजारी म्हणून भूमिकेत असणारे विजय गांवकर यांनीही याला दुजोरा देत या चित्रपटातील बारीक सारीक गोष्टींबाबत दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर किती सजग असत हे सांगितले. कोरोना काळात काहीजण किती बेपर्वा वागत होते हे चित्रपटात आम्ही दाखवले आहे. डॉ. विठ्ठल गाड यांनी या चित्रपटातील छोटीशी भूमिका करतानाच हा मालवणी बोलीतील किती वेगळा चित्रपट आहे हे जाणवल्याचे आणि याचे यश नक्की आहे. हे दिग्दर्शकांना आधीच सांगितल्याचा किस्सा सांगितला.
तळेरे येथील डॉ. मिलिंद कुलकर्णी इतक्या वर्षांत कोकणात प्रॅक्टीस करताना अनुभवाला आलेले कोकण तितक्याच सच्चाईने चित्रपटात अनुभवणे हा रोमांचक आणि स्वतःचा शोध घ्यायला लावणारा अनुभव होता हे विस्ताराने सांगितले.
ख्यातनाम कवी श्री प्रसाद कुलकर्णी यांनी अजून चित्रपट पाहिला नसला तरी गप्पा ऐकून हा चित्रपट किती गुणवंत आहे हे कळल्याने आता लवकरात लवकर आपण तो पाहू असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या गप्पांना अनपेक्षितपणे काहीकाळ उपस्थित राहण्याची संधी मिळालेले ज्येष्ठ पत्रकार, समाज आणि राजकारणाचे अभ्यासक डॉ. उदय निरगुडकर यांनी उप विभागीय बोली भाषांचे सामर्थ्य आणि त्यातून प्रत्ययाला येणारी संस्कृती, समाजदर्शन यावर भाष्य करत चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
वंदना करंबेळकर, कवी-लेखक कल्पना मलये, मनिषा पाटील, राजस रेगे , श्रेयस शिंदे, श्री भोसले, डॉ. राजेंद्र चव्हाण आदी रसिक प्रेक्षकांनी चित्रपटात आपल्याला भावलेल्या गोष्टी, यातील अस्सल मालवणी बोली, कलावंताचा विलक्षण अभिनय, छायाचित्रण याबद्दल दिग्दर्शक व कलावंतांशी घरच्या मायेने संवाद साधला.
सुमारे दोन तास रंगलेल्या या गप्पांनी पाडव्याच्या आधीची संध्याकाळ संस्मरणीय झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
अमिता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा सावंत, सूत्रसंचलन मनीषा पाटील तर आभारप्रदर्शन विद्या घाणेकर यांनी केले.
सखी परिवाराच्या डॉ.शमिता बिरमोळे, अर्पिता मुंबरकर, सृष्टी शिर्के, विशाखा येरम, प्रतिमा नाटेकर, सुनंदा मराठे, श्रद्धा कदम आणि डॉ.संदीप नाटेकर, सिद्धेश खटावकर, सौ. व श्री भोसले, नीलिमा नाटेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री मराठे , श्रद्धा कदम आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य धनराज दळवी, लीना काळसेकर, सीमा कोरगावकर तसेच सोना कोरगावकर, विश्रांती कोयंडे, राकेश काणेकर, प्रतीक्षा कोयंडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहाय्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!