*कोंकण एक्सप्रेस*
*दांडी ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षा ठेव रक्कम कमी करण्यात यावी*
*सौरभ ताम्हणकर यांची मागणी*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण दांडी ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूकिसाठी असणारी सुरक्षा ठेव कमी करावी अशी मागणी आज भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी पर्यटन व्यावसायिक यांच्यासमवेत
आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन केली यावेळी त्यांनी याबाबतचे निवेदनही आमदार निलेश राणे यांना दिले यावेळी त्यांच्यासमवेत सौरभ ताम्हणकर सोबत रुपेश प्रभू, रश्मीन रोगे व इतर उपस्थित होते
दरम्यान, मालवण दांडी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी यापूर्वी दोन व्यवसायिकांना परवानगी देण्यात आली असताना आता नव्याने प्रस्ताव दाखल केलेल्या व्यवसायिकांना परवानगी देतेवेळी सुरक्षा ठेव म्हणून १ लाख रुपये अनामत ठेव रक्कम भरण्याची अट महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने ठेवली आहे. एकाच जलमार्गावर वेगवेगळे नियम करून नवीन व्यवसायिकांना पर्यटन व्यवसायातून बाजूला करण्याचे धोरण मेरीटाईम बोर्डाने आखलेले आहे, असा आरोप भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी करत सुरक्षा ठेव रक्कम १ लाख ऐवजी कमीत कमी ५ हजार ते १० हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी बंदर व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात श्री ताम्हणकर यांनी म्हटले आहे की, मालवण बंदरामध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मालवण दांडी जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई कार्यालयात अकरा व्यवसायिकानी प्रस्ताव सादर केलेले होते. या व्यावसायिकांना पद्मगड (दांडेश्वर मंदिर) ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यास उद्देशपत्र देण्यात आलेले आहे. प्राप्त उद्देशपत्रामध्ये अटी शर्ती दिलेल्या असून अटी/शतींपैकी अट क्रमांक ५ ही अट सर्व व्यवसायिकांना मान्य नाही. त्या अटीमध्ये सुरक्षा ठेव रक्कम रुपये १ लाख रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई या नावाने उद्देशपत्र निर्गमित केल्याच्या दिनांकापासून एक महिन्याचे आत वा कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. परवानगी करीता आवश्यक वैध कागपत्रांची पुर्तता केल्यास सदरची सुरक्षा ठेव रक्कम परत करण्यात येईल. अन्यथा सदरची रक्कम ना-परतावा असेल याची नोंद घ्यावी, असे म्हटले आहे. दांडी जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर मेरीटाईम बोर्डाने यापूर्वी दोन व्यवसायिकांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र त्यावेळी १ लाख सुरक्षा ठेव ची अट नव्हती. मात्र नवीन व्यवसायिकांना परवानगी देतेवेळी सुरक्षा ठेव रक्कम म्हणून १ लाख एका महिन्यात जमा करण्याची अट ठेवली आहे. म्हणजेच एकाच जलमार्गावर वेळवेगळे नियम तयार करुन एक लाखाची अट लावून नवीन व्यावसायीकांना पर्यटन व्यवसायातून बाजूला करण्याचे धोरण महाराष्ट्र सागरी मंडळाने आखलेले आहे, असा आरोप सौरभ ताम्हणकर यांनी या निवेदनात केला आहे.
व्यावसायीक बँकेचे कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरु करणार आहेत. त्यात ही अट लादल्यामुळे पुढे व्यवसाय करावा किंवा कसे याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. व्यवसायिकांना एक लाख रक्कमेच्या अटी पुर्तता करणे शक्य होणार नाही. ही लादलेली अट रद्द करुन सुरक्षा ठेव रक्कम कमीत कमीत रु. ५०००/- ते रु. १०,०००/- करुन व्यावसायिकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी सौरभ ताम्हणकर यांनी निवेदनात केली आहे.