*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा सुधारा : अन्यथा तीव्र आंदोलन*
*नागरिक आक्रमक : वैद्यकीय अधिकाऱ्यांना घातला घेराव*
*वेंगुर्ले प्रतिनिधी : प्रथमेश गुरव*
वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण रुग्णालया प्रमाणेही रुग्णसेवा मिळत नाही. कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक रुग्णांच्या सेवेसाठी नसतात. अनेक पदे रिक्त आहेत. कॉन्ट्रॅक्ट वरील कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. यासह अनेक प्रश्नांचा भडीमार करत वेंगुर्लेतील नागरिकांनी आज वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप सावंत यांना घेराव घालत धारेवर धरले. येत्या १० एप्रिल पर्यंत आरोग्य सेवेत सुधारणा करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत आज सकाळी नागरिकांनी अचानक रुग्णालयात धडक दिली. यावेळी संजय गावडे, महेश वेंगुर्लेकर, इर्शाद शेख, जयराम वायंगणकर, किरण खानोलकर, वृंदा मोर्डेकर, आकांक्षा परब, वाल्मीक कुबल, सचिन शिरोडकर, ऋषिकेश आडारकर, पप्पा गवंडी, श्री. गावस्कर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. रुग्णालयात मेडिसिन बाबत कायम तक्रारी असतात. दोन दिवसापूर्वी रुग्णाला टाके घालण्यासाठी सुई नव्हती अशी दयनीय अवस्था आहे.
या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक कायम हवे. पण वैद्यकीय अधिकारी पदाचा चार्ज डॉ. संदीप परब यांच्या कडे आहे. ते आठवड्यातून फक्त चार वेळा येथे असतात. बाकी डॉक्टर शिकाऊ असल्याने येणाऱ्या पेशंटांना तपासून थेट ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठवले जातात. केवळ उपजिल्हा रुग्णालयाचा बोर्ड लागला याला काही अर्थ नाही. तशी सेवा या ठिकाणी मिळाली पाहिजे. येथे सोनोग्राफी होत नाही, डायलिसिसची सेवा नाही, तज्ञ डॉक्टर नाहीत. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. येथे येणाऱ्या गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे येथे दहा तारीख पर्यंत आरोग्य सेवा सुधारा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभारू. योग्य रुग्णसेवा देता येत नसेल तर रुग्णालय बंद करा असा इशारा या नागरिकांनी दिला आहे