*कोंकण एक्सप्रेस*
*काजू बी अत्यल्प -कीडरोगाचा प्रादुर्भाव*
*उत्पादनात मोठी घसरण, हमीभावासाठी शेतकऱ्यांची मागणी*
*शिरगांव : संतोष साळसकर*
हवामानातील अनियमित बदलांचा काजू उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे स्पष्ट होत आहे. अचानक होणारे वातावरणातील बदल, अनियमित तापमान आणि ढगाळ हवामानामुळे काजू पिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट झाली असून केवळ १५ ते २० टक्केच उत्पन्न मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काजू बीला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
मागील वर्षीही अशाच प्रकारचा कीडरोग झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. काजू व आंबा ही कोकणातील प्रमुख नगदी पीके असून शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण यावर अवलंबून असते. यंदा काजू झाडांवर चांगला मोहर दिसून आला असतानाही फुलोऱ्याच्या अवस्थेपासूनच थ्रिप्स, टी-मस्किटो बग यांसारख्या किडींचा प्रचंड प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घसरण झाली आहे.
या किडींच्या प्रादुर्भावामुळे काजू बी आणि बोंडू विकृत स्वरूपात दिसून येत आहेत. काजू बी हिरव्या अवस्थेत असतानाच डोळ्याजवळ मोहर चिकटून बसल्यामुळे कीड लागते आणि त्याचा शिरकाव थेट काजूगरापर्यंत होतो. अशा काजू बियांना काळसर डाग पडतात त्यामुळे बाजारपेठेतील मागणी कमी होते. व्यापाऱ्यांकडून अशा बियांना नकार मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.
सध्या वेंगुर्ला-४ काजू बीसाठी १५० रुपये आणि वेंगुर्ला-७ बीसाठी १६० रुपये प्रति किलो एवढा दर मिळतो आहे. हा दर अत्यल्प असल्याने किमान २०० रुपये दर मिळावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकऱ्यांना काजू बागांची निगा राखण्यासाठी लागणारी खते, फवारणी, महागडी औषधे आणि मजुरी यामुळे खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र उत्पादन अत्यल्प झाल्यामुळे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
याशिवाय, काजू बोंडू प्रक्रिया उद्योग स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना बोंडू फेकून द्यावी लागत आहेत, ज्यातूनही कोणतेही उत्पन्न मिळत नाही. हीही एक गंभीर समस्या ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने लक्ष घालून काजू बीस हमीभाव जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी सर्वत्र होत आहे.